नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा आपण गरिब समाजातून आल्यानेच विरोधक आपल्याला शिव्या देतात असे सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु २० लाख रुपयांचा सूट, ३ लाखांचा चष्मा, १.५ लाखांचा पेन आणि ८ हजार कोटींचे विमान वापरणारे नरेंद्र मोदी गरीब कसे? हा प्रश्न देशातील गरिब जनतेला पडला आहे. अशी गरिबी या समाजाला का लाभली नाही, ह्याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कन्हान (रामटेक) येथील प्रचारसभेत काँग्रेस व इंडिया आघाडीवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, १० वर्षांत एससी, एसटी, आदिवासी समाजाचा विकास केला हा मोदींचा दावा खोटा आहे. उलट मोदी सरकारने मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या बजेटमध्ये कपात केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केल्याचे सांगताना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घटनापासून वंचित ठेवले. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यापासून वंचित ठेवले. आता कोणत्या तोंडाने नरेंद्र मोदी आदिवासींचा सन्मान केला असे सांगतात.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका आल्या की दलित, आदिवासी, ओबीसी, गरिब लोकांची आठवण येते. १० वर्षांत या समाजासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही. १० वर्षांत या समाजघटकांवर अनन्वित अत्याचार केले गेले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मोदी सरकारमुळेच गेले आहे. आदिवासींच्या जमिनी हिरावून घेऊन उद्योगपतींच्या घशात घातल्या. गरिबांना अधिक गरिब बनवले, असा आरोप त्यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण काँग्रेसने संपवले हा नरेंद्र मोदी यांचा आरोपही खोटा व दिशाभूल करणारा आहे. भाजपाची मातृसंस्था आरएसएसला संविधान, देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यापासूनच मान्य नाही. संविधान बदलण्याची भाषा संघ परिवार व भाजपाचे नेतेच सातत्याने करत असतात. लोकसभा निवडणुका सुरु होताच अनंतकुमार हेगडे या भाजपा नेत्याने ४०० पारचे बहुमत आले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागारानेही संविधान बदलले पाहिजे असे स्पष्ट केले आहे. असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान मोदी व भाजपाला शोभत नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

मागील १० वर्षातील मोदी सरकारचा कारभार हा शेतकरी, कामगार, महिला, तरुणवर्ग यांना उद्ध्वस्त करणारा ठरला आहे. देशात ४० वर्षांतील सर्वात मोठी बेरोजगारी आहे. मोदी सरकारने नोकरभरती केली नाही. तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आणि १० वर्षं.. हा तर ट्रेलर आहे असे म्हणतात. पण हा ट्रेलरच जनतेला देशोधडीला लावणारा असेल तर जनता पुन्हा भाजपा व एनडीएला मते कशाला देईल, असा सवाल त्यांनी केला.

