Homeटॉप स्टोरीशेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी...

शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी मिळणार एकरकमीच!

कारखान्यावर जाणाऱ्या ऊसाची एफआरपी एकरकमीच मिळणार असल्याची ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियष गोयल यांनी राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांना नुकतीच दिली.

दिल्ली येथील कृषीभवनामध्ये केंद्रीय  वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दालनात आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाची ऊसाच्या एफआरपीसंदर्भात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात गोयल यांनी हे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासमोर राज्यातील वस्तुस्थिती मांडली. राज्यामध्ये काही संघटना जाणीवपूर्वक केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. यावेळी गोयल यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणार नाही आणि तशाप्रकारचा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही.

शुगरकेन ऑर्डर ऍक्ट १९६६नुसार शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्यावर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतील.  केंद्र सरकार एफआरपीमध्ये कोणताही बदल करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठक संपताच असे पत्रही गोयल यांनी खोत यांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच एक पत्र राज्यशासनालादेखील दिले आहे.

या बैठकीस वाणिज्य विभागाचे सहसचिव सुबोध कुमारदेखील उपस्थित होते. शिष्टमंडळामध्ये खासदार उन्मेश पाटील, खासदार सुनील मेंढे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, रयत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. एन. डी. चौगुले इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे तसेच याविषयी केंद्राशी सातत्याने संपर्क ठेवून ही बैठक तत्काळ घडवून आणल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सदाभाऊ खोत यांनी आभार मानले.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content