Homeपब्लिक फिगरराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लुटला...

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लुटला काँग्रेसी भोजनाचा आनंद!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत आहे. या यात्रेत काल ते दिवसभर मराठवाड्यात होते. या काळात त्यांनी आपल्या मंत्रीपदालाही न्याय दिला. पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर घेतल्याच पण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, या काँग्रेसी नेत्यांच्या खास घरी जाऊन भोजनाचा आनंदही लुटला. पक्षाच्या पातळीवर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विसंवाद असला तरी व्यक्तीगत पातळीवर मात्र प्रीतीभोजनापर्यंतचे मधुर संबंध दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आहेत, हे यामुळे स्पष्ट झाले.

जयंत पाटील यांच्यातील अभ्यासू स्वभावासह त्यांच्यातील ऊर्जेचे काल त्यांच्या सहकाऱ्यांना दर्शन घडले! सकाळी 8 ला सुरू झालेल्या दौऱ्याच्या शेवटी चक्क रात्री 12 पर्यंत ते नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात व्यस्त होते!

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात जयंत पाटील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत मराठवाडा दौरा करत आहेत. शनिवारी त्यांनी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर उदगीर येथे संजय बनसोडे यांच्याकडून उदगीर मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यापाठोपाठ अहमदपूर येथेही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघाची आढावा बैठक घेऊन पाटील नांदेडला पोहोचले.

तत्पूर्वी सकाळी 8ला दौरा सुरू केलेल्या जयंत पाटील यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव घरी भेटी देणे, विविध उद्घाटने, रस्त्यात होणारे स्वागत या सर्व कार्यक्रमांना त्यांनी आवर्जून वेळ दिला.

सकाळी 8 वाजता असणारा उत्साह रात्री 11.30च्या बैठकीतदेखील टिकवून ठेवणे हे पक्षवाढीसाठी काम करतानाच आपण सांभाळत असलेल्या खात्याची जबाबदारीदेखील तितक्याच निष्ठेने सांभाळणे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाकडील विविध मंजूर/प्रलंबित कामे आदी विषयांवर आढावा बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी पाटील यांच्यासह नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खा. हेमंत पाटील यांच्यासह  जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मध्यरात्री 12ला बैठक संपवून ते अशोक चव्हाण यांच्याकडे भोजनास गेले आणि परत शासकीय विश्रामगृहावर आल्यावरही शहरातील कार्यकर्त्यांशी रात्री उशिरापर्यंत त्यांचा संवाद सुरूच होता. त्यानंतर त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र पाटील यांच्यातील या ऊर्जेची चांगलीच चर्चा होती..

Continue reading

युद्धबंदीमुळे इस्रायलने टाळले रोजचे 17 अब्ज रुपयांचे नुकसान!

इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली...

इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर

इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीच्या ताज्या उद्रेकामुळे मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून खालील गोष्टी दिसून येत आहेत.  1. बालीसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाली आहेत.  2. ज्वालामुखीच्या...

कोरेगावचा योगगुरू देतोय व्हिएतनाममध्ये योगाचे धडे!

साताऱ्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गोपीनाथ खताळ व्हिएतनाममध्ये योगगुरू बनला असून तिथल्या नागरिकांना योगाचे धडे देतोय. शेतकरी कुटुंबातील गणेशची गोष्ट एकदम प्रेरणादायक आहे! गणेशचा जन्म कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला; त्याला लहानपणी शाळेत असताना योगाची...
Skip to content