Homeपब्लिक फिगरराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लुटला...

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लुटला काँग्रेसी भोजनाचा आनंद!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सध्या पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत आहे. या यात्रेत काल ते दिवसभर मराठवाड्यात होते. या काळात त्यांनी आपल्या मंत्रीपदालाही न्याय दिला. पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर घेतल्याच पण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, या काँग्रेसी नेत्यांच्या खास घरी जाऊन भोजनाचा आनंदही लुटला. पक्षाच्या पातळीवर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विसंवाद असला तरी व्यक्तीगत पातळीवर मात्र प्रीतीभोजनापर्यंतचे मधुर संबंध दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आहेत, हे यामुळे स्पष्ट झाले.

जयंत पाटील यांच्यातील अभ्यासू स्वभावासह त्यांच्यातील ऊर्जेचे काल त्यांच्या सहकाऱ्यांना दर्शन घडले! सकाळी 8 ला सुरू झालेल्या दौऱ्याच्या शेवटी चक्क रात्री 12 पर्यंत ते नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात व्यस्त होते!

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात जयंत पाटील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत मराठवाडा दौरा करत आहेत. शनिवारी त्यांनी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर उदगीर येथे संजय बनसोडे यांच्याकडून उदगीर मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यापाठोपाठ अहमदपूर येथेही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघाची आढावा बैठक घेऊन पाटील नांदेडला पोहोचले.

तत्पूर्वी सकाळी 8ला दौरा सुरू केलेल्या जयंत पाटील यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव घरी भेटी देणे, विविध उद्घाटने, रस्त्यात होणारे स्वागत या सर्व कार्यक्रमांना त्यांनी आवर्जून वेळ दिला.

सकाळी 8 वाजता असणारा उत्साह रात्री 11.30च्या बैठकीतदेखील टिकवून ठेवणे हे पक्षवाढीसाठी काम करतानाच आपण सांभाळत असलेल्या खात्याची जबाबदारीदेखील तितक्याच निष्ठेने सांभाळणे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाकडील विविध मंजूर/प्रलंबित कामे आदी विषयांवर आढावा बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी पाटील यांच्यासह नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खा. हेमंत पाटील यांच्यासह  जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मध्यरात्री 12ला बैठक संपवून ते अशोक चव्हाण यांच्याकडे भोजनास गेले आणि परत शासकीय विश्रामगृहावर आल्यावरही शहरातील कार्यकर्त्यांशी रात्री उशिरापर्यंत त्यांचा संवाद सुरूच होता. त्यानंतर त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र पाटील यांच्यातील या ऊर्जेची चांगलीच चर्चा होती..

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content