उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आज नवी दिल्लीत ‘खादीसमवेत अमृत महोत्सव’ या डिजिटल प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करतील. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केव्हीआयसी अर्थात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने ही प्रश्नमंजुषा तयार केली आहे.
भारताचा स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यसैनिकांचे समर्पण आणि त्याग तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून खादीची परंपरा यांच्याशी जनसामान्यांची नाळ जोडण्याचा यामागचा उद्देश आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा, स्वदेशी चळवळीतली खादीची भूमिका आणि भारतीय राजकीय पटलासंदर्भातल्या प्रश्नांचा या प्रश्नमंजुषेत समावेश आहे.
आज म्हणजेच ३१ऑगस्ट २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ असे पंधरा दिवस ही प्रश्नमंजुषा सुरू राहणार असून केव्हीआयसीच्या सर्व डिजिटल मंचावरून दररोज ५ प्रश्न मांडण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://www.kviconline.gov.in/kvicquiz/ ला भेट द्या. सहभागी व्यक्तींनी १०० सेकंदात सर्व पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. दररोज सकाळी ११ वाजता प्रश्नमंजुषा सुरू होणार असून पुढचे १२ तास म्हणजेच रात्री ११ वाजेपर्यंत हे प्रश्न पाहता येणार आहेत.
कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त अचूक उत्तरे देणाऱ्या सहभागीला त्या दिवसाचा विजेता म्हणून जाहीर केले जाईल. दरदिवशी २१ विजेत्यांची (प्रथम पारितोषिक, १० द्वितीय पारितोषिके आणि तिसऱ्या क्रमांकाची दहा पारितोषिके) नावे जाहीर करण्यात येतील. दरदिवशी विजेत्यांना खादी इंडियाची एकूण ८०,००० रुपये मूल्याची ई-कुपन्स दिली जातील. केव्हीआयसीच्या www.khadiindia.gov.in. या ऑनलाईन पोर्टलवर त्याचा वापर करता येईल.

