शरद पवारांना शेवटी सत्य सांगावं लागलं… याचा मला अतिशय आनंद आहे. मी जी गुगली टाकली, त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आले. पण ते अर्धच सत्य बाहेर आलंय. उरलेले सत्य मी बाहेर काढेन. त्यांच्या गुगलीमुळे मी क्लीनबोल्ड व्हायच्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच क्लीन बोल्ड झाले आहेत. माझ्या दुसऱ्या गुगलीने उर्वरित सत्य बाहेर येईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेलं नातं तोडले. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत होतो. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी भाजपासोबत येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीची बैठक झाली. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना अधिकार देण्यात आले. बैठकीत ठरल्याप्रमाणे मी आणि अजित पवार यांनी सर्व तयारी केली. मात्र शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडावरच माघार घेतली.
यावर शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या हालचालींची कबुली देत आपण भाजपा सत्तेसाठी कायकाय करू शकते हे जनतेला दाखवून दिल्याचे सांगितले. सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि आमची चर्चा झाली होती. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण मी जर निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली? माझा पाठिंबा होता तर दोन दिवसांत सरकार का पडले? मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. गुगली कशी टाकायची हे मला चांगलेच माहित आहे. त्यांनी विकेट दिली तर मी काय नको म्हणू.., असा सवाल शरद पवार यांनी केला. विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून कधी सांगतो का? असा टोलाही त्यांनी लगावला.

