मुंबईतल्या जरीमरी येथील मुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली असून ती बांधण्यासाठी अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. ही घटना रविवारी संध्याकाळी 6.40 वाजता घडली. त्यामुळे विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
ही भिंत कोसळल्यानंतर तेथे फक्त पत्र्याने परिसर बंदिस्त केला आहे. प्रशासनाचे काम अत्यत धिम्या गतीने चालू आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट करत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. कुर्ला अंधेरी मार्गावरील जरीमरी कब्रस्तानसमोरची ही भिंत असून तिला रनवे लागूनच आहे. याठिकाणी मुंबई महापालिकेचे काम सुरू असून जेसीबीमुळे भिंत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळ प्रशासनाने ज्या तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विमानतळाची सुरक्षा आणि त्याचे महत्त्व लक्षात घेता भिंत जलद गतीने बांधणे आवश्यक आहे. तेथे फक्त पत्र्याने काय साध्य होईल, असा सवाल गलगली यांनी केला आहे.

