महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागावाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागावाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागावाटप निश्चित केले जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, येथे काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर पटोले यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जागावाटपावरून मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. २०१४, २०१९ व आताची परिस्थिती वेगळी आहे. २ व ३ तारखेला काँग्रेस प्रत्येक जागेचा आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेईल. महाराष्ट्र काँग्रेसच्या विचाराचे राज्य आहे. विदर्भातही काँग्रेसचा जनाधार वाढलेला आहे. मागील तीन वर्षांत आम्ही सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला मागे टाकत विजय मोठा संपादन केला आहे. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व बाजूंचा विचार करुन जागावाटप होईल, असेही ते म्हणाले.

भाजपाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्याबदद्ल भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपाला मान्य आहेत का? महापुरुषांचा अपमान करत असताना भाजपाची तोंडे बंद का होती? भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे, असेही पटोले यांनी सांगितले.
विस्तारीत कार्यकारिणीत विविध ठराव मांडून ते मंजूर केले. विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आदी उपस्थित होते.

