शिक्षक भरतीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काही काळासाठी स्थगिती दिली गेली होती. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारची भरती आपण सुरू केली. आता ही स्थगिती उठलेली आहे. भरतीचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. त्यामुळे कंत्राटावरील सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा जास्तीतजास्त एक ते दीड महिना चालेल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
राज्यातले शिक्षण आणि शिक्षक या विषयावर सतीश चव्हाण यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली होती. शिक्षणामध्ये देशात याआधी दुसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सातव्या क्रमांकावर गेला आहे, असे ते म्हणाले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याला उत्तर दिले. केंद्र सरकारने आता वर्गीकरणाची पद्धत बदलल्यामुळे महाराष्ट्राचा क्रमांक सातवा लागला आहे. यातील तपशीलवार माहिती अशी आहे की, पहिल्या पाच क्रमांकावर एकही राज्य नाही आणि सहाव्या क्रमांकावर चंदीगड आणि पंजाब या दोघांचा समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्रासह इतर सर्व राज्ये सातव्या क्रमांकावर आहेत, असे ते म्हणाले.
राज्य सरकार नव्या दमाचे तयार झालेले शिक्षक सोडून सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीवर घेत आहे, याबद्दल सुधाकर अडबाले यांनी सरकारवर टीका केली. त्याला उत्तर देताना केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले. जिल्हा परिषदांकडून 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यादरम्यान रोस्टर व बिंदू नामावली निश्चित करून जाहिराती दिल्या जातील. एक सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. 10 ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. 11 ते 21 ऑक्टोबरदरम्यान नेमणुका होतील. त्यानंतर 21 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत नव्याने दाखल होणाऱ्या शिक्षकांना शिक्षकांचे कौन्सिलिंग केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

