स्वतःच्या धमकी प्रकरणात संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी कितीही तोंड लपवण्याचा प्रयत्न केला तरी मकोकामधला आरोपी मयूर शिंदे याला पाळण्यासाठी आणि वापरण्यासाठी या दोन्ही भावांना नक्की जेलवारी करावी लागणार, असे मत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी काल माध्यमांशी बोलताना केले.
पोलीस संरक्षण वाढवण्यासाठी स्वतःलाच धमकी देण्याचे कुभांड रचणाऱ्या या दोघा भावांची काल इतकी नाचक्की झाली की हे दोघे सैरभर फिरत होते आणि बडबडत होते. परंतु कितीही लपलपवी केली, आमच्यावर कितीही आरोप केले, मयूर शिंदे या पक्षात गेला होता, त्या पक्षात गेला होता, असे सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हा मयूर शिंदे कोणाचा कलेक्शन एजंट आहे? कुणासाठी वसुली करत होता हे साऱ्या भांडुपला माहित आहे. त्यामुळे या दोन्ही भावांनी किती तोंड लपवले तरी या प्रकरणात त्यांना जेलवारी करावी लागणार हे नक्की आहे, असे ते म्हणाले.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. यांना कोणी, कुठे लपवले आहे हे पोलिसांना चांगले माहित आहे. त्यामुळे तेही लवकरच सापडतील. या मयूरविरोधात पोलिसांकडे भरपूर पुरावे आहेत. सीडीआर आहेत. कोणी कुणाला कधी फोन केले हे सारे त्यामुळे स्पष्ट होईल, म्हणून दिल्लीत जाऊन आमच्यावर किती आरोप केले तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही नितेश राणे म्हणाले.
काल पालघरमध्ये जय-वीरूची जोडी दिसून आली. त्यामुळे अनेकांना बरनॉलची गरज भासली. भांडुपपासून लंडनपर्यंत अनेक जण तो रात्रभर लावत होते. हे दोन्ही नेते कसे फुटतात या प्रयत्नात असलेली मंडळी भयंकर अस्वस्थ झाली. त्यामुळे आज सामन्यामध्ये विविध प्राण्यांना आणत अग्रलेख लिहिला गेला. पण या भटक्या कुत्र्याला कळले पाहिजे की हा फेविकॉलने जोडलेला मजबूत जोड आहे, असेही त्यांनी सांगितले.
ठाण्यामध्ये शंभरहून अधिक लोकांना पोलीस संरक्षण दिले गेले आहे. याबद्दलही संजय राजाराम राऊत यांनी टीका केली आहे. माझा राऊत यांना सवाल आहे की, महाविकास आघाडीच्या काळात कोणाकोणाला संरक्षण देण्यात आले होते? यात मालकाचे नातेवाईक किती होते? वरूण सरदेसाईना का संरक्षण देण्यात आले होते? वैभव चेंबरमध्ये येणाऱ्यांना का पोलीस संरक्षण देण्यात आले होते, ही सर्व माहिती त्यांनी अजित पवार यांनाही द्यावी, असेही ते म्हणाले.
याच राऊत यांनी समान नागरी कायद्यावरही भाष्य केले आहे. निवडणुका आल्या की यांना समान नागरी कायदा, राम मंदिर आठवतो असे ते म्हणाले. आमच्यावर असे आरोप करण्याआधी राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकले असते तर बरे झाले असते. समान नागरी कायदा ही देशाची गरज आहे असे प्रत्येक नागरिकाला वाटते. लोकसंख्या नियंत्रणात यावी असे त्यांना वारंवार वाटते. त्यामुळे लोकांची मन की बात ऐकून केंद्रातले सरकार योग्यवेळी याचा निर्णय घेईलच. आज अजितदादांनी हीच भूमिका मांडली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यावर जसे तुमच्या मालकांच्या मराठी माणूस आणि मुंबई तोडण्याची भाषा ओठावर येते, तसे आम्ही नाही आहोत हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे अकलेचे तारे तोडण्यापेक्षा हिम्मत असेल तर ट्रिपल तलाकला विरोध करणाऱ्या सुप्रिया सुळेंना, नाना पटोलेंना तुमची भूमिका मांडून विरोध करायला हवा होता. आता हिम्मत असेल तर पाटण्यात 23 जूनला होणाऱ्या बैठकीत समान नागरी कायद्याला समर्थन देत असल्याचे जाहीर करा, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.

