रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांची धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथे सदिच्छा भेट घेतली.
येत्या 16 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीतर्फे आयोजित जागतिक धम्म परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून धम्मगुरू दलाई लामा यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण आठवले यांनी यावेळी दिले. यावेळी महाराष्ट्रातील आंबेडकरी; बौद्ध जनतेशी मला संवाद साधायचा आहे. त्यामुळे मी नक्की उपस्थित राहणार असल्याचे सांगत दलाई लामा यांनी धम्म परिषदेचे निमंत्रण स्वीकारले. यावेळी आठवले यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीचे सरचिटणीस अविनाश कांबळे, खजिनदार पद्मश्री कल्पना सरोज उपस्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवले. लाखो अनुयायांसह डॉ. बाबासाहेबांनी धम्मदिक्षा घेतली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत महालक्षी रेसकोर्स मैदान येथे धम्मदिक्षा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र त्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे महालक्षी रेसकोर्स मैदानात धम्मदिक्षा सोहळा आजोजित करण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी यंदा 16 डिसेंबर 2023 रोजी ऐतिहासिक धम्मपरिषद मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दलाई लामा यांना दिली.
वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध संघटनेच्या आंतरराष्ट्रीय मानद उपाध्यक्षपदी रामदास आठवले यांची नुकतीच बँकॉक येथे निवड झाल्याबद्दल दलाई लामा यांनी त्यांचे अभिनंदन केले. जगात मोठ्या प्रमाणात नरसंहार करणारे घातक शस्त्रास्त्रे निर्माण होत आहेत. ही घातक शस्त्रे नष्ट केली पाहिजेत. जगात शांतता या तत्त्वाचे हत्यार निर्माण झाले पाहिजे. अहिंसा आणि शांती यामुळेच मानव कल्याण होईल. भगवान बुद्धाच्या तत्त्वप्रणालीत शांतता, अहिंसा या तत्त्वांना महत्त्व दिले आहे. जगाला या युद्ध नाही तर बुद्धाची गरज आहे, असेही दलाई लामा यांनी सांगितले.