लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे संबंधित वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. त्यामुळे या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय निरूपम यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर ४८ मतांनी विजय झाला. मात्र विरोधकांनी या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, इंडिया आघातील सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रातील खोटी बातमी पोस्ट केली. त्या सर्वांनी माफी मागायला हवी. जर वृत्तपत्राने माफी मागितली आहे तर आदित्य ठाकरेंनीही माफी मागायला हवी. निवडणूक आयोगाकडून पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडत असताना एका वृत्तपत्राच्या खोट्या बातमीचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या निकालावर चुकीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी.
दरम्यान, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असा दावा निरुपम यांनी केला. जर ईव्हीएम हॅक होऊ शकते मग काँग्रेसच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. सुमारे एक लाख मतांची मोजणी शिल्लक असताना उबाठा गटाचे अमोल कीर्तिकर विजयी झाले अशी बातमी संध्याकाळी ५.४० वाजता कशी व्हायरल होते? असा सवालही त्यांनी केला.