आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पत्र लिहिणं दुर्मिळ झालं आहे. मात्र, पत्र लिहिणं हे अतिशय भावनिक असतं. अभिनेत्री पूजा सावंतनं स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाच्या निमित्तानं पूजानं स्वहस्ते पत्रलेखन करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे.
पूजा स्वतः स्वामीभक्त आहे. त्यामुळे पूजानं अत्यंत तळमळीनं स्वामींना पत्र लिहिलं आहे. त्यात पूजानं स्वतःसाठी काहीही न मागता अतिशय भावनिक मुद्दा मांडला आहे. मुक्या प्राण्यांची मदत करण्याची बुद्धी सर्वांना मिळावी, भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही इतकं सक्षम करा, माझा पत्ता जरी सध्या बदललेला असला तरी मन मोकळं करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवण्याचा पत्ता मला मिळाला आहे, अशा भावना पूजानं पत्रात व्यक्त केल्या आहेत.
मनीष कुमार जायस्वाल आणि मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. महेश कुमार जायस्वाल, कीर्ती जायस्वाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार – महेश यांचे श्रवणीय संगीतदिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.