Homeचिट चॅटआमची एसएससी आता...

आमची एसएससी आता ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात!

गोष्ट खरी आहे की आमची एसएससी आता साठ वर्षांची झाली. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात आली. काय म्हणता? नीट कळलं नाही? जरा सविस्तर सांगा की राव! म्हणजे असं झालं की आम्ही SSC (एसएससी), माध्यमिक शालांत परीक्षेसाठी शाळेतून बाहेर पडलो त्या गोष्टीला आज साठ वर्षे पूर्ण होत आहेत.

कारण आमची एसएससीची बॅच ही १९६४ची. मात्र आता आम्ही “म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान”! थोडक्यात सांगायचं तर आम्ही मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत १९६४ साली ११-अ या वर्गात होतो. म्हणूनच २०१४ साली आम्ही सारे जण एकत्र येऊन आमच्या एसएससीची पन्नाशी अर्थात सुवर्ण महोत्सव खूप उत्साहाने साजरा केला. या घटनेस आजमितीस ६० वर्ष पूर्ण झाली आहेत.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतरसुद्धा आम्ही (‘अ’ वर्गातील मुले-मुली) नित्यनेमाने अधूनमधून स्नेहसंमेलन घडवीत असतो. असेच एक स्नेहसंमेलन गतसाली ऑक्टोबर महिन्यात मिलिंद सामंततर्फे विलेपार्ले‌ येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी, १० फेब्रुवारीला मोहन पराडकरने आपल्या निवासस्थानी आयोजित केले. या आमच्या स्नेहसंमेलनास १८-१९ जण येणारे होते. परंतु सर्वांचीच आता पंच्याहत्तरी सरली असल्याने वैयक्तिक, अपरिहार्य कारणामुळे काही जण येऊ शकले नाहीत. पर्यायाने आम्ही ११ जणच उपस्थिती देऊ शकलो.

असं असले तरी सारा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि एकमेकांसह गप्पागोष्टीत छानपणे रंगला. तो आनंद नक्कीच स्वागतार्ह होता. दुपारच्या सत्रात खास ऑर्डर देऊन बनवून घेतलेल्या उत्तम जेवणाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सायंकाळी चहापान झाल्याने छान तरतरी आली. याप्रसंगी रवी ठाकूरने आपले पुढले स्नेहसंमेलन एप्रिलमध्ये करण्याचे सूतोवाच करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्याच्या अर्धांगिनीनेदेखील याला दुजोरा दिला. म्हणजे तीन महिन्यानंतर पुन्हा सर्वांची गाठभेट होऊन या संख्येत उत्तम भर पडेल अशी आशा आहे. मात्र, मोहनकडील कार्यक्रम अतिशय सुंदर, खास आठवणीत राहण्यासारखा घडला हे नमूद केलेच पाहिजे.

– अशोक मोहिले, माहीम

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content