Homeटॉप स्टोरीओपिनियन पोल: ममतांचा...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तामिळनाडूत स्टालिन सरकारला धक्का बसण्याची शक्यता असून केरळात कांटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत असला तरी ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्तेत परतण्याची शक्यता ओपिनियन पोलमध्ये वर्तवली आहे. 294 जागांच्या बंगाल विधानसभेत बहुमतासाठी 148 जागा आवश्यक आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC)ला 155 ते 170 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजप हा 100 ते 115 जागांसह मुख्य विरोधी पक्ष म्हणून उभा राहू शकतो. TMC ला 44 ते 45 टक्के मतांचा हिस्सा मिळण्याची अपेक्षा आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवतील.

आसाम- हिमंता बिस्वा शर्मांचा सहज विजय

आसामच्या 126 जागांच्या विधानसभेत भाजपला 96 ते 98 जागा मिळण्याचा, तर काँग्रेसला केवळ 26 ते 28 जागांवर समाधान मानावे लागण्याचा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीत भाजपला 43-44 टक्के, तर काँग्रेसला 39-40 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मतांमधील फरक कमी असला, तरी जागांमधील फरक प्रचंड आहे. हे भारतीय निवडणूक व्यवस्थेचे एक वैशिष्ट्यपूर्ण गणित आहे. निवडणूक तारखा जाहीर होताच मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सोशल मीडियावर “यतो धर्मस्तातो जयः” असे पोस्ट केले- म्हणजे जेथे धर्म, तेथे विजय. आसामच्या जनतेने एकदा पुन्हा भाजपच्या विकासकामांवर विश्वास ठेवण्याचे संकेत सर्वेक्षणात दिले आहेत.

ममता

तामिळनाडू- स्टालिन सरकारला धक्का! AIADMK-NDA आघाडी सत्तेच्या उंबरठ्यावर

या सर्वेक्षणातील सर्वात मोठा ‘उलटफेर’ अंदाज आहे तो तामिळनाडूचा. IANS-Matrize सर्वेक्षणानुसार, AIADMK नेतृत्त्वाखालील NDA आघाडी सत्ताधारी DMK सरकारला सत्तेतून खाली खेचू शकते. AIADMK आघाडीला 39-40 टक्के मते आणि 114-127 जागा मिळण्याचा, तर DMK ला 37-38 टक्के मते आणि 104-114 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 234 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 जागा आवश्यक आहेत.

अभिनेते-नेते विजय यांच्या तमिलागा वेत्री कळगम (TVK) पक्षाला 14-15 टक्के मते आणि 6-12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. TVK हा या निवडणुकीतील सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. भाजपने विजय यांना उपमुख्यमंत्रीपद आणि 80 जागांची ऑफर देत आघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 2021च्या निवडणुकीत DMK आघाडीने 159 जागा जिंकल्या होत्या, तर AIADMK पक्ष 75 जागांवरच थांबली होती. आता पाच वर्षांत चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता सर्वेक्षण दाखवत आहे.

केरळ- डाव्यांचा ऐतिहासिक तिसरा कार्यकाळ, की काँग्रेसचे पुनरागमन?

केरळमध्ये LDF आणि UDF यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. 140 जागांच्या केरळ विधानसभेत बहुमतासाठी 71 जागा आवश्यक आहेत. LDF ला 61-71 जागा, तर UDF ला 58-69 जागा मिळण्याचा अंदाज आहे. LDF ला 42-43 टक्के, तर UDF ला 41-42 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे- म्हणजे दोन्ही आघाड्यांमध्ये अवघ्या एक-दोन टक्क्यांचा फरक! दक्षिण केरळातील 48 जागांपैकी LDF ला 22-25, UDF ला 18-22 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मध्य केरळातील 44 जागांपैकी मात्र UDF आघाडीवर- तेथे UDF ला 21-26 आणि LDF ला 17-20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. केरळात भाजपला केवळ दोन जागा मिळण्याची शक्यता असली, तरी भाजपची डबल-डिजिट मतांची टक्केवारी इतर पक्षांचे गणित बिघडवू शकते. केरळ हे देशातील एकमेव राज्य आहे जेथे डावे पक्ष सत्तेत आहेत आणि LDF ने ऐतिहासिक तिसरा कार्यकाळ मिळवला, तर ती भारतीय राजकारणातील एक दुर्मिळ कामगिरी ठरेल.

पुद्दुचेरी- काँग्रेस-DMK आघाडी विरुद्ध AINRC-BJP-AIADMK

पुद्दुचेरीच्या 30 मतदारसंघांमध्ये काँग्रेस-DMK-CPI आघाडीसमोर ऑल इंडिया एनआर काँग्रेस, भाजप आणि AIADMK यांची विरोधी आघाडी आहे.

एकूणच, पाच राज्यांचा एकत्रित आढावा घेतल्यास बंगाल आणि आसामात विद्यमान सरकारांचा विजय जवळपास निश्चित दिसतो; केरळात चाकू-सुरीची लढत असून एक-दोन जागांवर सत्ता अवलंबून राहील; तामिळनाडूत स्टालिन सरकारला सत्ता टिकवणे अवघड जाणार आहे आणि विजय यांच्या TVK चे ‘स्पॉइलर’ म्हणून काम करणे निर्णायक ठरेल. सर्व पाच राज्यांचे निकाल 4 मे रोजी एकत्रितपणे जाहीर होतील. हा दिवस भारतीय राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर...

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...
Skip to content