नवी मुंबईतल्या खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत ही समिती शासनास शिफारशी करेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा – अजित पवार
दरम्यान, खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे. ही घटना निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
विशेष अधिवेशन बोलवा – नाना पटोले
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. हे मृत्यू उष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांकडे केली आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या शवचिकित्सा अहवालही आले आहेत. यामध्ये १४ जणांपैकी १२ जणांनी सात तास आधी काहीही खाल्ले नव्हते, असे आढळून आले असल्याचे कळते. त्यातील काही जणांना इतरही काही व्याधी होत्या. उन्हामुळे त्यांना त्रास झाला. त्यांना सावलीचीच गरज होती. पाण्याने त्यांना काही विशेष फरक पडला नसता, असेही यात म्हटल्याचे समजते.

