काल मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतल्या सर्व मशिदींच्या भोंग्यांना आम्ही परवानगी दिली असे सांगितले. अशी परवानगी ते कशी देऊ शकतात? आज कित्येक मशिदी अनधिकृत आहेत. मशिदीच अनधिकृत असतील तर त्यावरील भोंगे अधिकृत कसे होणार? म्हणजेच अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी… हा काय प्रकार आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फक्त काही विशेष प्रसंगी पोलिसांनी परवानगी दिली पाहिजे. हिंदूंच्या कार्यक्रमांना परवानगी देताना शाळांच्या परिसरात देणार नाही, रूग्णालयाच्या परिसरात देणार नाही. रोजच्या रोज परवानगी घ्यावी लागणार. मग, यांना वर्षाचे ३६५ दिवस परवानगी कशी मिळते? यांनाही रोजच्या रोज परवानगी द्या. त्यांच्या भोंग्यांचा आवाज ४५ ते ५५ डेसिबल इतकाच असायला हवा. म्हणजेच घरी मिक्सर वापरला की येतो ना, तेव्हढा. पोलिसांना दुसरे काही कामच नाही का, की ते रोज दिवसांतून पाच वेळा डेसिबल तपासत राहतील.. असेही ते म्हणाले.
आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. ताब्यात घेतले जात आहे. आपण कोणत्या काळात वावरतो? मोबाईलच्या युगात ताब्यात घेण्याने काय उपयोग होणार? पोलीस अजून ६०-७०च्या दशकात वावरल्यासारखे वागतात. आज मुंबईतल्या ११४० मशिदींपैकी १३५ मशिदींमध्ये पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वीची अजान लाऊडस्पीकरवरून देण्यात आली. महाराष्ट्र पोलीस या मशिदींविरूद्ध काय कारवाई करणार? का कारवाई फक्त आमच्यावरच, असा सवाल त्यांनी केला.
मशिदींच्या भोंग्यांविरूदधचे आंदोलन हे फक्त आजच्यापुरता मर्यादित नाही तर जोपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरत नाहीत तोपर्यंत अशा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण केलेच जाईल. हा विषय फक्त मशिदींपुरताच मर्यादित नाही तर मंदिरांवरचेही भोंगे उतरवावे लागतील. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक आहे. पण कोण जर याला धार्मिक स्वरूप देऊ पाहात असेल तर आम्हीही तयार आहोत, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

