भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम भारतातील कोणत्या न कोणत्या भागात अशांतता असतेच. संकटे, मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, सतत येत असतात. भारतातील अनेक राज्यांना भेट देऊन, तेथील अनुभव प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘अस्वस्थ दशकाची डायरी’त लिहिले आहेत. मन अस्वस्थ करणारा हा अनुभव आता आपल्याला ‘स्टोरीटेल’च्या ऑडिओबुक्सद्वारे श्राव्यरूपात खुद्द अविनाश धर्माधिकारी यांच्याच आवाजात ऐकता येणार आहे.
‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांचा प्रवास माजी सनदी अधिकारी ते चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक असा आहे. प्रशासकीय सेवेत असताना लोकाभिमुख प्रशासनाचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबविले. स्वेच्छानिवृत्तीनंतर चाणक्य मंडलसारख्या संस्थेतून त्यांनी कित्येक सक्षम अधिकारी घडविले आहेत. युवकांचे प्रेरणास्थान, उत्तम वक्ता, विचारवंत, अशीही त्यांची आणखी काही रूपं आहेत. ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. राज्यशासनाचा उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार या पुस्तकाला लाभला आहे.
‘देशाचा कार्यकर्ता’ होण्याचे स्वप्न वयाच्या सोळाव्या वर्षी पाहिल्यावर ज्ञानप्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून काम आणि मुक्त पत्रकारिताही सुरू होती. सामान्य लोकांपासून नेत्यांपर्यंत सर्वांशी बोलून त्यावर मुख्यत: ‘माणूस’ साप्ताहिकात ते लेखन करायचे. पंजाब, आसाम, काश्मीर व दिल्लीतील राजकारण, शहाबानो प्रकरण, गुजरातमध्ये पेटलेले राखीव जागांविरोधी आंदोलन आणि महाराष्ट्रातली शेतकरी चळवळ, अयोध्या विवाद या सर्वांवर त्यांनी जे अभ्यासपूर्ण लेखन केले, त्यातूनच त्यांचे पहिले पुस्तक ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ आकाराला आली आहे. ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ या पुस्तकाबद्दल प्रख्यात ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत म्हणाल्या आहेत की, “केवळ साहित्यिक व्हायच्या हौसेने केलेले हे लेखन नाही. तरीदेखील याची गणना उत्तम ललित लेखनात करता येईल”.
अनेक दिग्गजांनी प्रशंसा केलेल्या अविनाश धर्माधिकारी यांच्या ‘अस्वस्थ दशकाची डायरी’मधील आर्त अनुभव ऐकण्यासाठी https://www.storytel.com/in/en/books/aswastha-dashkachi-diary-1524332, या लिंकचा उपयोग होईल.

