राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुच्छल यांच्यासह ११ गुणवंत महिलांना काल राजभवन येथे सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुणे येथील सूर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर मातृत्व म्हणजे सहनशीलता, प्रेम व कारुण्यभाव असे सांगताना स्त्रीशक्ती अद्भुत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
मनुष्य कितीही यशस्वी झाला, संपन्न झाला व यशवंत झाला तरीही सुख-दुःखप्रसंगी त्याला आईचीच आठवण येते, असे सांगून माता, मातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल असे राज्यपालांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियन, डॉ. स्वाती लोढा, आरती देव, ॲड. वैशाली भागवत, तृशाली जाधव तसेच सूर्यादत्त समूहाच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनादेखील हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूर्यदत्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ. निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार व वैशाली भागवत यांनी सत्काराला उत्तर दिले. पलक मुच्छल यांनी गीत सादर केले तर उर्वशी रौतेला यांनी गढवाली गाणे म्हटले.