केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत, प्रसिद्ध बँकर नारायणन वाघुल यांनी लिहिलेल्या ‘रिफ्लेक्शन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. भारताच्या वित्तीय परिदृश्यातील अनेक दशकांच्या वाघुल यांच्या अनुभवांची स्पष्ट आणि तपशीलवार नोंद या पुस्तकात आहे. या प्रकाशन सोहळ्याला पायाभूत सुविधा आणि विकासासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या राष्ट्रीय बँकेचे (एनएबीएफआयडी) अध्यक्ष के. व्ही. कामथ, पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल, जेपी मॉर्गनच्या दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाच्या माजी अध्यक्ष कल्पना मोरपारिया यांच्यासह प्रख्यात बँकर्स आणि आघाडीच्या वित्तीय संस्थांचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
नारायणन वाघुल यांचा बँकिंगमधील व्यापक अनुभव आणि त्यांच्या नेतृत्त्वगुणांसाठी निर्मला सीतारामन यांनी त्यांची प्रशंसा केली. नेत्यांना घडवण्यासाठीचे त्यांचे योगदान त्यांनी अधोरेखित केले ज्याची संस्मरणीय छाप उमटली आहे. वाघुल यांच्या महिला सक्षमीकरणाच्या कल्पना आणि दूरदृष्टीवर सीतारामन यांनी प्रकाश टाकला. आर्थिक सेवांमध्ये महिला अधिक संख्येने नेतृत्त्व स्वीकारत असल्याने भारतासाठी या कल्पना आणि दृष्टीकोन कायम समर्पक आणि मौल्यवान राहतील, असे त्या म्हणाल्या.

भारतातील आधुनिक बँकिंगचे शिल्पकार मानले जाणारे वाघुल यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील नाट्यमय, मनोरंजक आणि अनेक महत्त्वपूर्ण घटना शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत. चित्तवेधक किस्से अंतर्भूत असलेले हे पुस्तक विविध उपक्रमांना स्पर्श करते.
वाघुल यांनी स्थापित केलेल्या प्रक्रिया भारतीय आर्थिक व्यवस्थेतील बळकट आणि शाश्वत पद्धती बनल्या. बँकिंग प्रतिभेच्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि बँकिंगमध्ये अधिकाधिक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी घडवले. यामुळे स्त्री-पुरुष समानता संस्कृती वाढीला लागली.

