शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने काल प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर केलेल्या युतीत ठाकरे गटाने त्यांच्या कोट्यातल्या जागा आंबेडकरांसाठी सोडाव्यात. त्याचप्रमाणे ऐनवेळी आंबेडकरांची वंचित पलटणार नाही, याची काळजी उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, अशा आशयाचे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यंचे कान टोचले.
शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये, याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा आणि सतर्कता बाळगली पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी त्याला कुणाचा विरोध नाही. परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी त्यांनी घेणे आवश्यक आहे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल. वातावरण निर्माण करण्यासाठी मागण्या, घोषणा, ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या भारतीय जनता पार्टीकडून सुरू आहेत. सध्या विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न चिंचवडमध्ये भाजपा करत आहे. मात्र खरी चौकशी तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली तर भाजपाचा किती भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? – अजित पवार
दरम्यान, शिवसेना-वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला.
राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले. उद्धव ठाकरे यांची आज आम्ही भेट घेणार आहोत. त्यावेळी यावर स्पष्टपणे चर्चा करू व त्यानंतर आमची भूमिका मांडू असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचे त्यांनी त्यांच्या कोट्यातून घ्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती, आघाडी होते त्यावेळी ‘मागचं झालं, गेलं.. गंगेला मिळालं..’ असं करुन पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.
मुळात मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे याअगोदरच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला बरोबर घ्या, अशी सकारात्मक चर्चा झाली होती. चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांसंदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेससोबत चर्चा करतोय. याशिवाय जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणुका लढवल्या जाव्यात ही भूमिका असून याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगितले जाईल असेही अजित पवार म्हणाले.
एखाद्याची महत्त्वाची नेमणूक ज्यांनी केली आहे त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करायची असते. त्यातूनच राज्यपालांनी ती इच्छा व्यक्त केली असावी, असे पवार म्हणाले.

