संजय राऊत.. समाजमाध्यमावरील ‘संज्या’, विरोधी पक्षांचा आवडता ‘भोंगा’ आणखी ‘शिळा वडापाव’ खाणारा हे आणि अशासारखे हेटाळणीचे सूर पदोपदी कानावर झेलणारा सामनाचा कार्यकारी संपादक संजय राऊत आमच्या लोकसत्ता- लोकप्रभेतील सहकारी तर होताच पण त्याहीपेक्षा अधिक मित्र होता. एक्स्प्रेसच्या जाहिरात खात्यातील एक तरुण माधवराव गडकरी संपादक असलेल्या केबिनमध्ये बिनधास्त जाऊनयेऊन असायचा, याबाबत काहीसे कुतूहल असायचे.. आणि ते कुतूहल त्या आठवड्याचा लोकप्रभा प्रकाशित झाला की संपायचे. कारण त्यात संजयची गुन्हेगारी जगताविषयीची कव्हरस्टोरी असायची. मीही गुन्हेगारी वृत्तांचे वृत्तांकन करीत असल्याने मी ती स्टोरी एका झटक्यात वाचून काढायचो! संजय यांनी मुंबईच्या गँगवॉरवर विशेत: दाऊद, अरुण गवळी, अमर नाईक, रमा नाईक, गुरु साटम आदी गुन्हेगारांवर लिहून तेव्हा हवा बरीच गरम केली हॊती. त्याचा कळस म्हणजे आग्रीपाड्याच्या दगडी चाळीवर तेव्हाचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अरविंद इनामदार यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने धाड घालून हत्यारे व देशी तसेच विदेशी बनावटीची पिस्तुले व अन्य घातक शस्त्रे ताब्यात घेऊन गवळीला ‘टाडा’ लावून अटक केली हॊती. (पुढे कायदेशीर लढाईत गवळीची निर्दोष मुक्तता झाली ही गोष्ट अलहिदा). झाले.. संजयला एका लेखाचा ‘जर्म’ सापडला आणि तो लोकप्रभेतून कडाडला.. ‘इनामदार की इमानदार’ आणि त्याने अभिरूप न्यायालयाचा आधार घेत दगडी चाळीवरील धाडीच्या ‘चिंधड्या’ उडवल्या होत्या. याची आठवण अजूनही ताजी वाटावी इतकी नवी आहे. झाले.. या अभिरूप खटल्यावर ‘राम राम देवा’ इनामदारसाहेब इतके वैतागले की, त्यांनी लोकप्रभा व एक्सप्रेस समूहावर खटला गुदरला! हा खटला इतकी वर्षे चालला की, लोकसत्तेच्या संपादकपदी डॉ. अरुण टिकेकर आल्यानंतर तो सामोपचाराने मागे घेण्यात आला. तोवर संजय राऊत ‘सामना’च्या कार्यकारी संपादकपदी रुजूही झाले होते. त्यांची गाडी वेगात दौडत हॊती.
लोकप्रभेत लिखाणाची दौड सुरु असतानाच संजय यांची मनसेचे (त्यावेळी नव्हती) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मैत्री झाली. बऱ्याचवेळा राज त्यांना भेटायला एक्स्प्रेस टॉवरमध्ये येत असत. ते दोघे गाढ मित्र कधी झाले हे त्या दोघांनाही ठाऊक नसेल. पण ते तसे मित्र होते हे मात्र नक्की! यातूनच पुढे कार्यकारी संपादकपदी संजय यांचे नाव पुढे आले. वाचकहो तुम्ही विचाराल, अहो हे ‘कुरवाळी संजयराया..’ आज करण्याचे प्रयोजन काय? प्रयोजन मोठेच आहे. कारण आज या मित्राचे ‘नरकातला स्वर्ग’ हे तुरुंगातल्या अनुभवावर आधारित पुस्तक प्रकाशित होत आहे. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासात संजय राऊत यांनी अवैध मार्गाने भरमसाठ पैसा जमा करून त्याचा विनियोग केला असा सणसनाटी आरोप इडीने ठेवून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केली. या तुरुंगात ते १०१ दिवस होते. त्याचीच ही कहाणी. म्हटली तर ही कहाणी, डायरी, अनुभव, तुरुंगातील जिणे, तुरुंगातील कचरा, समदुःखी कैद्याची करुणा आणि याच किंवा अशाच आरोपाखाली अटक केलेल्यांची माहिती हे सर्व आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे एक जळजळीत राजकीय सत्य जनतेसमोर उघडे पडण्याची जिद्द यातून दिसते. यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

पत्राचाळ पुनर्वसनासारखी प्रकरणे या मुंबई व महानगराच्या परिसरात लाखोंनी आहेत. माझे तर असे म्हणणे आहे की, मुंबई, ठाण्याच्या प्रत्येक गल्लीत किमान पाच-सात तरी प्रकरणे असतीलच. भाजप लोकप्रतिनिधी असलेल्या भागात ही अनेक आहेत हे विशेष. भाजप नेत्यांचा प्रभाव असलेल्या मुंबईतल्या चेंबूरमध्ये तर सुभाष नगरचा प्रकल्प २५हून अधिक वर्षे लटकला आहे. मस्का चाळ प्रकल्प अर्धवट होऊन रखडला आहे. मुलुंडमध्येही काही प्रकल्प २५ वर्षांपासून रखडलेले आहेत. तेथेही भरमसाठ पैशाचा व्यवहार झाला आहे का? हेही तपासून पाहा ना! संजय यांच्या ‘नरकातल्या स्वर्गात’मुळे केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालायचेही वसुली एजन्ट आहेत हे जगासमोर उघड झाले. ‘फिरोज मामा, फरीद मामा, रोमी भगत आणि जितू नवलानी’ अशी त्यांची नावे असून हे प्रमुख आहेत. चिंधीचोर यापेक्षाही अधिक आहेत. तसेच या इडीच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठीही काही नामचीन वकील आहेत, मगर भीडू खिसा बहोत गरम मंगता है! तसेच तुरुंगातही पैसे खिलवणे मजबुरीतून येते. त्याशिवाय सुखाने हगणेही नशिबात नसते (बिरबलाची गोष्ट आठवा). इडीचे अधिकारीही किती इरसाल असतात याचीही थोडीशीच झलक येथे पाहायला मिळते. नाहीतर बहुतेकांनी हम मजबूर है..चीच टेप लावलेली दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्राचा उल्लेखही या पुस्तकात आहे. या पत्रात संजय यांनी एकूण ६४ कंपन्याची यादी दिली असून या सर्वांचे व्यवहार संशयास्पद वाटतात असा स्पष्ट उल्लेख या पत्रात आहे. दुर्दैवाने यावर काहीच कारवाई झालेली दिसत नाही.
“There is generally nexus between bureaucracy, political leaders, law enforcing agencies and offenders indulging directly such crimes” असं सर्वसाधारण सूत्र असताना काही ‘निवडक’ माणसांनाच आरोपी करण्यात आल्याने मूळ आरोपतील हवाच जणू निघून गेली हॊती. या प्रकल्पात सुमारे बारा बिल्डरांनी भाग घेतला होता किंवा सहभागी होण्याची इरादापत्रे दिली होती, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. असे असताना प्रवीण राऊत वगळता एकाही बिल्डरशी संबंधित व्यक्तीची साधी चौकशीही कशी झाली नाही, हा प्रश्न उरतोच. रहेजासारख्या मोठया बिल्डरला तसेच भाजपच्या लाडक्या मोहित कंबोज यांच्या कंपनीची साध्या प्रश्नोत्तरांवर कशी बोळवण केली गेली हेही महाराष्ट्राला समजले पाहिजे. शिवाय अशा प्रकल्पात कळीचा मुद्दा ठरलेल्या भाडेकरू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना का मोकळे सोडण्यात आले, तेही जनतेला कळायला हवे. कारण पदाधिकाऱ्यांची संघटनाच बिल्डरची निवड करत असते.असो. अखेर १ आगस्ट २०२२ रोजी संजय यांना रीतसर अटक केली गेली व त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केली गेली. तेथे त्यांचा मुक्काम तब्बल साडेतीन महिने होता. याच तुरुंगात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नबाब मलिक, उद्योगपती अविनाश भोसले, गरवारे तसेच काही बिल्डर मंडळींही हॊती.
तुरुंगातून संजय यांनी मुलींना लिहिलेली पत्रेही वाचण्यासारखी आहेत. मुलींची उत्तरेही तितकीच संवेदनाशील आहेत. या संपूर्ण प्रकरणात वहिनी वर्षा यांना नाहक गोवण्यात आले. त्याही संजय यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या हे प्रकर्षाने जाणवते. याप्रकरणी इडी न्यायालयाने जामीन देताच इडीने जामीन मिळू नये म्हणून जंगजंग पछाडले. परंतु उच्च न्यायालयाने जामीनाला स्थगिती देण्यास चक्क नकार दिल्याने इडीचे काहीच चालले नाही. मात्र संजय राऊत जामीनावर बाहेर आल्यानंतर नेमके काय झाले, किती तारखा पडल्या, तेथे इडीने काय युक्तीवाद केला (की केलाच नाही) हे मात्र अद्यापी बाहेर आलेले नाही. कदाचित मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणाला नवी फोडणी दिली जाईल!
छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे
विजयकुमार काळे साहेब,
संजय राऊत साहेबांच्या ग्रंथाचा आणि
त्यांच्या पत्रकारितेतील पूर्व
इतिहासाचा आपण करून दिलेला परिचय अप्रतिम आहे.
दिवाकर शेजवळ