सोलापूर विमानतळ पूर्णपणे तयार असून या विमानतळावरून तत्काळ विमानसेवा सुरू करण्याची व या विमानतळाला भारतातील विमान निर्मिती उद्योगाचे जनक व सोलापूरचे सुपुत्र शेठ वालचंद हिराचंद यांचे नाव देण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली. यावर आपण लवकरच चेंबरच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊ, अशी ग्वाही मंत्रीमहोदयांनी दिली.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-06-at-6.54.29-PM.jpeg)
महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्नासंबंधी ललित गांधी यांनी काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. कोल्हापूर विमानतळावरून नवीन मार्ग सुरू करणे, कोल्हापूर-दिल्ली, कोल्हापूर-जोधपूर या नवीन मार्गांची मागणीसुद्धा यावेळी सादर करण्यात आली. त्याचबरोबर धावपट्टी विस्तारीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. अमरावती व रत्नागिरी विमानतळ सुद्धा लवकरात लवकर सुरू करावेत असा प्रस्ताव ललित गांधी यांनी सादर केला. कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी ललित गांधी यांनी केली. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कौशल्य विकास समितीचे चेअरमन संदीप भंडारी उपस्थित होते.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-06-at-6.54.28-PM-1024x696.jpeg)
सोलापूर विमानतळावरील विमानसेवा लवकरात लवकर सुरू करू, अशी ग्वाही मोहोळ यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील सध्या कार्यरत असलेले विमानतळ, नवीन प्रस्तावित विमानतळ यांच्या विस्ताराबरोबरच विमानसेवा व विमानमार्गांचा विस्तार करून महाराष्ट्रातील एकूण विमानसेवांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.