Homeकल्चर +आता, मास्क हा...

आता, मास्क हा पेहरावाचाच अविभाज्य भाग!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळविले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच.. असा जबरदस्त आत्मविश्वास व्यक्त करतानाच महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मुंबईच्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना मास्क हा आपल्या पेहरावातला एक अविभाज्य भाग असल्याचे आवर्जून नमूद केले.

शुक्रवार, २१ मे २०२१ पासून सुरु झालेल्या फेसबुक लाईव्ह वसंत व्याख्यानमालेचे ‘कोरोनाशी लढाई आपण जिंकणारच’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना ज्येष्ठ नेत्रशल्य विशारद, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी गेल्या दोन वर्षांतील कोरोना विरोधातील युद्ध लढताना काय काय उपाययोजना कराव्या लागल्या याची सविस्तर माहिती दिली.

कोरोना विषाणू जसा भारतात पर्यायाने महाराष्ट्रात आला तेव्हा वैद्यकीय सुविधा फारच कमी होत्या आणि मग त्या कशा वाढत गेल्या त्याची माहिती देतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचा फार मोठा फायदा शासकीय यंत्रणेला झाल्याचे आवर्जून सांगितले. वैद्यकीय आणि शास्त्रीय, वैज्ञानिक या बाबींची सांगड घालून योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आपण सर्व आरोग्ययंत्रणा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या समन्वयाने कोरोनावर नियंत्रण आणू शकलो, असे ते म्हणाले.

मास्क

मास्क, सॅनिटायझर आणि सतत हात धुणे या गोष्टी अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगताना डॉ. तात्याराव लहाने यांनी आजही पन्नास टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.

दोन जण चहा प्यायला गेले तर आधी एकाने मास्क काढून चहा प्यावा, जेवण एकत्र घ्या पण एकाने जेवा तोवर दुसऱ्याने तोंडावर मास्क राहू द्यावा, असे आळीपाळीने चहा/भोजनाचे सेवन करता येते. आपण घरातून बाहेर पडल्यावर शर्टपँट काढतो का? नाही ना? तसेच मास्क हाही आता आपल्या कपड्यांबरोबरचा, पेहरावातला अविभाज्य भाग झाला आहे. तोंड आणि नाक झाकून योग्य पद्धतीने मास्क वापरला आणि स्वच्छता, अंतर व्यवस्थित राखले तर कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणून तिसरी लाट थोपविण्यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास डॉ. लहाने यांनी बोलून दाखविला.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार बंद व्हायला हवेत. अशा प्रकारांमुळे वैद्यकीय यंत्रणेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला काहीही होणार नाही, काहीही झालेले नाही, अशा पद्धतीने मानसिकरित्या मजबूत राहणे गरजेचे आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने हलगर्जीपणा योग्य नाही, हेसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले.

लोकांनी हक्कांबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे, हे सांगायला डॉ. तात्याराव लहाने विसरले नाहीत. विजय वैद्य यांच्या नेतृत्त्वाखाली या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी केले तर डॉ. लहाने यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी सांभाळली.

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content