शेकडो वर्षांपासून ठाणे शहराला लागून असलेल्या खाडीचे सौंदर्य अधिकाधिक वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने सर्वच स्तरातून प्रयत्न होत असताना या खाडीचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे वन विभागाच्या कांदळवन कक्ष मुंबईमार्फत मोघरपाडा-ओवळा या गावातील ‘कांदळवन’ची समृद्धता आणि अधिवास लक्षात घेऊन निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यटकांना ‘कांदळवन बोट सफारी’ घडवून खाडीतील कांदळवन आणि जीवसृष्टी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
ठाणे खाडीचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा ठरत असताना संवर्धनासह रोजगारनिर्मितीच्या दृष्टीनेही शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. ही योजना विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी आणि सहाय्यक वन संरक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. समृद्ध कांदळवनाचे महत्त्व आणि संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, असे ठाणे (कांदळवन) वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे म्हणाले.

खारफुटी, फ्लेमिंगो, साप, मासे आदी जलसंपदा याबाबत अनेकांना समग्र माहिती नसते. पण त्यापेक्षाही भरपूर जैवसाखळी खाडीत दडलेली आहे. जलप्रदूषण आणि खाड्यांच्या किनारी व खाडीत होणारे अतिक्रमणाला रोखण्याची खबरदारी वन विभागाच्या कांदळवन कक्ष मुंबईमार्फत घेतली जाते. त्यामुळेच त्याची वाढ होत आहे, असे सांगण्यात आले.
खाडीविषयी सर्वांनाच माहिती असतेच असे नसल्यामुळे तिची माहिती ‘खोलवर’ देऊन, ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरीता वन विभागाने पुढाकार घेतला आहे. रोजगाराची मोठी समस्या लक्षात घेऊन ‘खाडी पर्यटन’ सुरू करताना वनविभाग (कांदळवन कक्ष), मुंबई कांदळवन संधारण घटक आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात ‘कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजना’ राबवली जात आहे. त्याबाबत पूर्वतयारी सुरू आहे, असे विक्रांत खाडे यांनी सांगितले.
ठाणे वनपरिक्षेत्र (कांदळवन) अंतर्गत मोघरपाडा-ओवळा गावामध्ये ‘कांदळवन सहव्यवस्थापन समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून घोडबंदर रोड येथील गायमुख बंदरालगत ‘कांदळवन निसर्ग पर्यटन’ केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.