राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेला अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करण्याकरिता उपाय सुचवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने माजी खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली असून त्यात क्रिकेटपटू एम एस धोनी, महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आदींचा समावेश आहे.
ही समिती छात्र सेनेच्या अधिक हितासाठी, एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांकडून हातभार लावण्यासाठी मार्ग सुचवणे, अशाच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय युवा संस्थेतल्या उत्तम पद्धतींचा एनसीसीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या दृष्टीने शिफारस करणे, बदलत्या काळानुरूप एनसीसी अधिक समर्पक करणे, राष्ट्र उभारणीमध्ये आणि विविध क्षेत्रात एनसीसी छात्रांना अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करणे याकरीता विविध उपाययोजना सुचविणार आहे.
समितीचे सदस्य याप्रमाणे-
माजी खासदार बैजयंत पांडा (अध्यक्ष), खासदार कर्नल (नि.) राज्यवर्धन राठोड, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आनंद महेंद्र, महेंद्र सिंह धोनी, अर्थ मंत्रालयातले मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल, जामीया मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा. वसुधा कामत, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर, मेजर जनरल आलोक राज (नि.), ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, एसआयएस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ऋतुराज सिन्हा, वॉटर डॉट ओआरजीच्या मुख्य संचालन अधिकारी वेदिका भांडारकर, डाटाबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद शाह हे सर्व या समितीचे सदस्य आहेत. मयांक तिवारी समितीचे सदस्य सचिव असतील.
एनसीसी ही युवकांमध्ये शिस्त, धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन, निःस्वार्थ सेवा बाणवत त्यांचे चरित्र घडवणारी गणवेशधारी मोठी संस्था आहे. समाजातल्या सर्व क्षेत्रात नेतृत्त्व करण्याचे गुण असलेले, संघटीत, प्रशिक्षित आणि ध्येयाने प्रेरित युवक संघटीत करण्याचा याचा उद्देश आहे.

