महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न, हा पुरस्कार महाराष्ट्र शासन सुरू करत असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. तरुण, महिला तसेच मराठी उद्योजक अशा तीन प्रवर्गासाठी आणखी तीन पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी केली.
बाहेरून येणारे उद्योग तसेच बाहेरून येणारी गुंतवणूक तसेच उभारले जाणारे उद्योग यांना सुलभपणे काम करता यावे याकरिता आणले जाणारे मैत्री विधेयक बहुमताने संमत करण्यात आले. या विधेयकावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागच्या अकरा महिन्यात महाराष्ट्रात एक लाख 18 हजार 422 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक आल्याचे स्पष्ट केले. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र आता पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे असे ते म्हणाले. मागच्या काही काळात वेदांत फॉक्सकॉन, पीडीपी असे काही प्रकल्प कोणत्या कारणामुळे महाराष्ट्राबाहेर गेले हे स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका येत्या चार दिवसांमध्ये सादर केली जाईल, असेही ते म्हणाले.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाने जानेवारी २०२२ मध्ये राज्य सरकारकडे अर्ज केला होता. त्यांना पुण्यामध्ये दोन हजार एकर जागा दाखवण्यात आली. ही जागा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये होती. दोन महिन्यानंतर हाय पॉवर कमिटीची बैठक झाली. मात्र त्यात या उद्योगाचा आणि त्याला देण्यात येणाऱ्या जागेचा विषय झाला नाही. यासाठी पुढची संमती देणारी कॅबिनेटची सब कमिटी 14 महिन्यानंतर अस्तित्त्वात आली. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला नाही. ही सब कमिटी आमच्या सरकारच्या काळात आली. त्यानंतर या कमिटीने तीन वेळा बैठका घेतल्या. या तीन बैठकांमध्ये आम्ही एक लाख कोटींपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणली, असेही उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
बारा बलुतेदारांसाठी महाड आणि रत्नागिरी येथे क्लस्टर उभारण्याचा एक पायलेट प्रोजेक्ट केला जाईल. नंतर कोल्हापूर येथे तसाच एक प्रोजेक्ट केला जाईल. सातारा येथे कॉरिडोर उभारण्यासाठी तीन हजार एकर जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. रायगडमध्ये लेदर क्लस्टर उभारले जाईल. रत्नागिरीमध्ये मँगो पार्क, रांजणगावमध्ये आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक पार्क, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे चाळीस हजार कोटींचे स्टील प्रोजेक्ट, रायगड जिल्ह्यातच सिनॉर्मस कंपनी उभारली जाईल. औषध क्षेत्रातील पीडीपी प्रकल्प महाराष्ट्र सरकार स्वतःच्या पैशाने उभारेल असेही सामंत यांनी सांगितले.

