जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातल्या मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून किमान 15 जूनपर्यंततरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. यादरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातल्या अनेक भागात कमाल तापमान 40 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाजदेखील आहे. 14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह काही भागातच पडेल, ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.