Homeटॉप स्टोरीयंदा मार्चापासूनच महाराष्ट्र...

यंदा मार्चापासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. यंदा मार्चमध्येच ऐतिहासिक उकाडा जाणवू लागला आहे. मुंबईत सरासरीपेक्षा 7.6 अंशांनी जास्त तापमान असून आरोग्य विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मार्चच्या या असह्य उकाड्याने महाराष्ट्रातील नागरिकांना आगामी उन्हाळ्याची चाहूल आधीच दिली आहे. हवामान बदलाचा हा ताजा इशारा गांभीर्याने घेऊन यंत्रणा आणि नागरिक दोघांनीही सज्ज राहणे आवश्यक आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी येत्या काही दिवसांत वादळी पाऊस व विजांसह यलो अलर्ट जारी केला आहे; मात्र मुंबई व एमएमआर क्षेत्रात तूर्तास पावसाची शक्यता नाही.

तापमानाचे आकडे धडकी भरवणारे

मुंबईच्या सांताक्रूझ हवामान केंद्राने 11 मार्च रोजीच या हंगामातील तब्बल 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले, जे मागील पाच वर्षांतील मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान ठरले. हे तापमान सरासरीपेक्षा 7.6 अंशांनी जास्त असल्याने त्याची ‘तीव्र उष्णतालाट’ (Severe Heatwave) म्हणून नोंद झाली. डहाणूतही सरासरीपेक्षा 9.6 अंश जास्त तापमान नोंद झाले आहे. काल मुंबईतील ओशिवरा येथे 38.6 अंश, विद्याविहारमध्ये 37.9 अंश, चेंबूरमध्ये 37.1 अंश आणि दहिसरमध्ये 36.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राम मंदिर (गोरेगाव) येथे 42.5 अंश आणि विक्रोळीत 41.7 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचल्याने मुंबईकरांची दमछाक होत आहे.

उर्वरित महाराष्ट्र विदर्भ ते कोकण

विदर्भातील अमरावती येथे कमाल 42.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर चंद्रपूरचा पारा 41.2 अंशांपर्यंत पोहोचला. डहाणू येथे 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले जे सरासरीपेक्षा तब्बल 9.6 अंशांनी जास्त होते, तर ठाण्याने 39.2 अंश सेल्सिअस नोंदवले.

गेल्या काही वर्षांशी तुलना

मुंबईत मागील पंधरा वर्षांपासून म्हणजे 2011पासून दरवर्षी मार्चमध्ये 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे; मात्र मार्च 2020 हा अपवाद ठरला, जेव्हा तापमान 37.5 अंशांपर्यंतच मर्यादित राहिले. मुंबईत सामान्यतः 10 मार्चच्या आसपास तापमान 35-36अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते; परंतु यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात इतके उच्च तापमान नोंदवणे, हे गेल्या दशकात प्रथमच घडले आहे. मुंबईतील मार्च महिन्यातील सर्वकालिक उच्चांक 28 मार्च 1956 रोजी 41.7 अंश सेल्सिअस एवढा होता.

वाढत्या उष्णतेमागील कारणे

पूर्वेकडील वारे आणि दक्षिण गुजरात व लगतच्या भागांवरील प्रतिचक्रीय वायुभ्रमण (Anticyclonic Circulation) यामुळे तापमानात ही वाढ झाली आहे, असे हवामानशास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. समुद्री वाऱ्यांचा (Sea Breeze) प्रभाव कमकुवत झाल्याने शहर थंड होण्याची प्रक्रिया रखडली आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, हवामान बदल आणि बदलत्या वायुमंडलीय स्थितींमुळे भविष्यात अशा तीव्र उष्णतेच्या घटनांची वारंवारिता वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

महाराष्ट्र आरोग्य विभागाने इशारा दिला आहे की, मानवी शरीराचे सामान्य तापमान 36.4 ते 37.2 अंश सेल्सिअस असते; परंतु उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ, हातापायांना सूज, स्नायू पेटके यांसारखी सौम्य लक्षणे दिसू शकतात, तर गंभीर प्रकरणांमध्ये उष्माघात, गोंधळ आणि हृदय, श्वसन तसेच मूत्रपिंड संबंधित आजारांची तीव्रता वाढू शकते.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी – आरोग्य विभागाचे आवाहन

पाणी भरपूर प्या- दर तासाला किमान एक ग्लास पाणी पिणे आवश्यक; तहान लागण्याची वाट पाहू नका.

उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा- सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कामाशिवाय बाहेर जाणे टाळावे.

हलके, सैल व सुती कपडे घाला- गडद रंगाचे कपडे टाळावेत.

भरपूर क्षार हवेत- ORS, ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत घ्या, शरीरातील क्षार व पाण्याचे संतुलन राखा.

मुले, वृद्धांची काळजी घ्या- लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांची विशेष काळजी घ्या.

उष्माघाताची लक्षणे ओळखा- डोके दुखणे, चक्कर येणे, घाम न येणे ही उष्माघाताची चिन्हे आहेत. अशावेळी तातडीने डॉक्टरांना दाखवा.

लहानग्यांना सांभाळा- वाहनात लहान मुले व प्राण्यांना एकटे सोडू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...
Skip to content