महाराष्ट्राच्या विधिमंडळात एका कथित विनोदवीराच्या कुजकट करामतींमुळे कामकाज थांबवले जाण्याची वेळ याआधी कधी आली नव्हती, ती या खेपेला आली. उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत धवल विजय प्राप्त केल्यानंतर मातोश्रीलाही आपली चाल खरेतर बदलावी लागली आहे. उद्धव ठाकरे सध्या विधान परिषदेचे सदस्य असून ते सभागृहात दररोज येतातच असे नाही. ते नसताना शिवसेना उबाठाच्या संबंधीचा हा विषय सभागृहात आला ही गंमत आहे. ज्या दिवशी कामराच्या कुजकट कथित कवितेमुळे विधान परिषदेचे कामकाज वारंवार बंद पडत होते त्याच दिवशी आदित्य ठाकरे एका बैठकीच्या निमित्ताने शिंदेंना भेटत होते. शिंदे ठामपणाने एक मुद्दा मांडत आहेत व आदित्य शांतपणाने ऐकत आहेत असे बोलके छायाचित्रच प्रसिद्ध झाले आहे. पण सूर्यापेक्षा वाळू तापते आणि चहापेक्षा किटली गरम असते तसा प्रकार झाला. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भक्ती असणार्या खऱ्या जुन्या शिवसैनिकांपेक्षा हा समाजमाध्यमांचा वापर हुषारीने करून स्वतःची तुंबडी भरण्याचा उद्योग करणारा इसम अधिक सेनाभक्त आहे की काय, असा भास तयार केला जात आहे. कामराच्या कथित काव्याचे नवे व्हीडिओ उबाठा सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेबाई प्रसृत करत आहेत. अंधारेंचाही सेनाप्रवेशही अलिकडचाच आहे आणि त्याही आपणच अधिक कडवे सैनिक आहोत असा भास निर्माण करत आहेत, हेही विशेष!
कुणाल कामराने एका कार्यक्रमात एक टुकार कविता सादर केली. त्यात एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडावर मातोश्री पद्धतीची टिप्पणी करण्यात आली होती आणि गद्दार, मिठाला न जागणारा, जिस थालीमे खाता है उसीमे छेद, बापाची निशाणी… अशा शब्दांचा मुक्त वापर केला होता. शिवाय रिक्षा, दाढी व ठाणे या शब्दांमुळे कुणाला उद्देश्यून कविता आहे हे पुरेसे स्पष्टही केले होते. त्या कवितेला तिथे जमलेल्या उबाठाप्रेमींनी दादही दिली म्हणतात. पण दुसऱ्या दिवशी त्याची तीव्र प्रतिक्रियाही आली. कारण कामराचे व्हीडिओ तातडीने यूट्यूबवर झळकत असतात. प्रतिक्रिया अशी आली की, शिवसैनिकांचा एक जत्था जिथे त्या कार्यक्रमाचे शूटिंग केले गेले तिथे पोहोचला. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका हॉटेलमध्ये तो कार्यक्रम झाला. तिथेच कामराचा स्टुडिओही आहे. या हॉटेलवाल्यांनी दोन इमारतींच्या मोकळ्या जागेत घुसखोरी करून काही बांधकाम केले. ती जागा हा कामरा वापरत होता.

कुणाल कामराचा आजवरचा व्यावसायिक प्रवास हा वाद व त्यातून मिळाणारी फुकाची प्रसिद्धी, यावरच झालेला आहे. तो मुद्दाम काही वाद, विषय तयार करतो. मोठ्या लोकांवर वाईट भाषेत, खालच्या दर्जाची टिप्पणी करून ते व्हीडिओ यूट्यूबवर टाकणे हाच त्याचा धंदा दिसतो. हा चाळीशीच्या आसपासचा इसम, मुंबईतच जन्मला, वाढला. इथेच शिकला. पण त्याचे शिक्षण अर्धवटच झाल्याचे दिसते. तो जयहिंद कॉलेजात दोन वर्षे होता. शिक्षण सोडून तो एका जाहिरात कंपनीत नोकरी करायला गेला. तिथेच त्याला वादे वादे जायते धनलाभः हा गुरुमंत्र मिळाला असावा. त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून गेल्या दहा-बारा वर्षात काम सुरु केले. सुरुवातीला तो स्वतःवर, मुंबईच्या टॅक्सीवाल्यांवर असे विनोद करून जनतेला थोडाफार हसवत होता. मग त्याला यशाची गुरुकिल्ली सापडली. छोट्यामोठ्या राजकीय नेत्यांवर टिप्पणी करून, वाद निर्माण करून त्यातून प्रसिद्धी व प्रसिद्धीतून पैसा हे गणित त्याने जमवले.
त्याने जानेवारी २०२०मध्ये म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात तत्कालीन ठाकरेंचे कट्टर विरोधक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना लक्ष्य केले. ज्या इंडिगो विमानातून गोस्वामी प्रवास करत होते, त्यात तो चुकून (की ठरवून?) प्रवास करत होता. गोस्वामींना बघितल्याबरोबर तो त्यांच्या आसनाजवळ गेला व मोठमोठ्यांदा आरडाओरड करून त्यांना आव्हान देऊ लागला. कारण अर्थातच गोस्वामींची ठाकरे सरकारच्या विरोधातील भूमिका. माझ्याशी बोला, माझ्याबरोबर वाद करा, मला उत्तर द्या, असे तो सांगत होता. गोस्वामींनी शांत राहणे पसंत केले. विमान कर्मचाऱ्यांनी कामराला तिकडून हाकलून जागेवर बसायला लावले. पण त्या दोन-चार मिनिटांत त्याने व त्याच्या सहकाऱ्याने गोस्वामींबरोबरचे त्याचे एकतर्फी संभाषण व आव्हान भाषा याचा व्हीडिओ केला होता. तो दोन मिनिटांचा व्हीडिओ त्याने लगेचच ट्विटरवर टाकला व त्याला प्रसिद्धीचा लाभ झाला. पण अशा मूर्खपणाच्या कृत्याचा व विमान कर्मचारी तसेच सहप्रवाशांना सतावण्याच्या कामराच्या कृत्याची इंडिगो कंपनीने तत्काळ व गंभीर दखल घेतली व त्याला इंडिगो विमानातून प्रवास करण्यासाठी बंदी घातली.

भारत सरकारनेही या विमानातील प्रकाराची गंभीर दखल घेतली. एअर इंडिया या सरकारी कंपनीने कुणाल कामरावर बेमुदत प्रवासबंदी घातली. सरकारने भूमिका घेतली म्हटल्यावर स्पाईस जेट वगैरे अन्य कंपन्यांनीही सहप्रवाशांना सतावणाऱ्या या उपद्रवी इसमावर बंदी घातली. काही डाव्या आणि उबाठाप्रेमींनी कामराचे स्वागतही केले. तितका लाभ त्याला पुरेसा होता. कामराने गोस्वामींच्या पत्रकारितेवर टीकाटिप्पणी सुरुच ठेवली. ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच पोलिसांनी गोस्वामींच्या चॅनेलविरोधात मोठी कृती केली. अर्णब गोस्वामी यांना मध्यरात्री त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. त्याविरोधात अर्थातच गोस्वामी न्यायालयात गेले. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांनी जामीन दिला. त्या निर्णयाच्या विरोधात कामराने ठाकरे समर्थनासाठी ट्विटरबाजी केली. त्यात त्याने न्यायालयावरच ताशेरे ओढले, म्हणून देशाच्या महाअधिवक्त्यांच्या शिफारसीनुसार कामरावर न्यायालयाच्या अवमानाचा खटलाही गुदरला गेला.
अशाप्रकारच्या राजकीय स्टंटबाजीतच रस व रुची असणार्या कुणाल कामराचा ताजा व्हिडिओही त्याच पद्धतीचा, ठाकरेंच्या राजकारणाची पाठराखण करणाराच आहे. त्याने एकनाथ शिंदेंच्या विरोधात कथित व्यंगकविता करताना मर्यादाचे उल्लंघनही केले आहे हेही स्पष्ट आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, विधानसभेतील क्रमांक दोनच्या मोठ्या पक्षाचे नेते, सेना उबाठापेक्षा दुपटीहून अधिक आमदार निवडून आणणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख आणि लोकांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या विरोधात अशी अपमानजनक भाषा वापरण्याचा कोणाताही हक्क ना कुणालला आहे, ना त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू पाहणाऱ्या अन्य कुणाला आहे. विधानसभेत व विधान परिषदेत याचे तीव्र पडसाद उमटले. हा विषय आता हक्कभंग समितीकडेही गेला आहे. पण त्यानिमित्ताने सेना उबाठा नेते आपली राजकीय पोळी भाजून घेऊ पाहत आहेत. हे कामरालाही माहित आहे, ही आणखी गंमत आहे. कदाचित तो ठाकरेंच्या पक्षाचा निष्ठावान व सच्चा सैनिक असेलही. पण गेल्या निवडणुकीत जनतेने काय कौल दिला याचे भान राजकारणातील प्रत्येकाला असायला हरकत नाही. पण कामराची भूमिका अशी दिसते की, मतपेटीतून उमटलेले जनतेचे मत काहीही असले तरी शिंदेंवर आम्ही शिक्के मारणारच. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले की, मूळ शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा कोणी चालवावा यावरचे जनतेचे मत २०२४च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील ज्या शिवसेनेकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आहे, त्याच पक्षाला लोकांनी समर्थन दिले आहे. याचे भान खरेतर कामरासारख्यांनी ठेवायला हवे. त्यांना ती बाब ध्यानी येत नसेल तर मग विधिमंडळाने त्यांच्या हातातील दट्ट्या वापरून त्यांना ते भान येईल याची कळजी घ्यायला हवी.