राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला येत्या विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहे. संघशताब्दीच्या निमित्ताने मुंबईतल्या गोरेगावात शारदीय नवरात्रात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मसुराश्रम आणि संस्कार भारती (उत्तर पश्चिम समिती कोकण प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात हा कीर्तन महोत्सव होणार आहे. दररोज सायंकाळी ४-३० ते ६-३० या वेळात गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडीमधील मसुराश्रमसह आगाशीचे श्रीभवानी शंकर मंदिर आणि श्रीराम मंदिर, मालाड पश्चिम येथेही कीर्तने होणार आहेत. या कीर्तनमालेत ह.भ.प. चंद्रशेखर अभ्यंकर, संजय पंडित, केतन गुप्ता, विजया वैशंपायन, उमेश घळसासी, माधुरी नवरे, शिवानी नेमावरकर, सुयोग आपटे, विकास दिग्रसकर , संकेत भोळे, आदी कीर्तनकार सहभागी आहेत. या कीर्तनमालेतून अभिनेते, नाट्य-चित्रपट आणि मराठीचे व्याख्याते उमेश घळसासी कीर्तनविश्वात पदार्पण करत आहेत.

आज देशभरात संघाचे व्यापक रूप साकारले आहे. हिंदुत्वाचा आणि भारतीयत्वाचा विचार तळागाळापर्यंत रुजवणाऱ्या रा. स्व. संघाच्या स्थापनेला २ ऑक्टोबर २०२५, विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या विस्तारासाठी अगणित प्रचारकांनी आपल्या समिधा वाहिल्या. या संघऋषिंच्या समर्पणातूनच आजचे संघाचे स्वरूप साकारले आहे. अशा दहा महानुभाव संघऋषिंच्या समर्पणाची गाथा या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. या महानुभावांमध्ये आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकर गुरूजी, वं. मावशी केळकर, दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे, नानाजी देशमुख, हरिभाऊ वाकणकर, बाळासाहेब देशपांडे, यादवराव जोशी, लक्ष्मणराव इनामदार यांचा समावेश आहे. प्रतिदिन यातील एखाद्या व्यक्तिमत्वावर कीर्तन होणार आहे.