रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
कालपासून बारसू येथे राज्य सरकारकडून माती परिक्षणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी तेथील ग्रामस्थांकडून सरकारला तीव्र विरोध करण्यात आला. उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांकडून त्यांना पाठिंबा दिला जात आहे. ही बाब समोर येताच उद्याग मंत्री उदय सामंत यांनी बारसू येथील जागेवर रिफायनरी करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत केंद्राकडे पाठवल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीच्या विरोधामागचे सुपारीबाज कोण, असा जाहीर सवाल करत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
आज सकाळी उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि बारसू रिफायनरीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना सामंत यांनी बारसू रिफायनरीसाठी जागा ताब्यात घेण्याचा विषय सध्या नसल्याचे स्पष्ट केले. सध्या फक्त जमिनीचे परिक्षण केले जात आहे. ही जमीन रिफायनरीसाठी योग्य असल्यास नंतर त्याबाबत विचार होईल. या रिफायनरीच्या प्रकल्पाबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाईल. जाईल. काल नाना पटोले यांनीही आपला प्रकल्पाला विरोध नसल्याचे सांगितले आहे. आज पवारांशी चर्चा झाली. उद्या काँग्रेसच्या नेत्यांशी, राज ठाकरेंशी, सर्वांशी चर्चा करू. जे समजूतदार नेते आहेत ते चर्चा करतील, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
सत्ताधाऱ्यांची नेमकी हीच भूमिका उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत वेगळे पाडण्यासाठी घेतली जात आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

