आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस हा राज्यात सत्तेत आहे आणि पटोले यांनी स्वतः ही मागणी केल्यामुळे राज्य सरकार याप्रकरणी चौकशी जाहीर करण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून विशेषतः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकारच्या एजन्सींचा गैरवापर प्रचंड प्रमाणात सुरू आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा वापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा एक सुनियोजित कट असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील एनसीबीच्या कारवाया पाहिल्यावर त्यासुद्धा याच कटाचा भाग आहेत, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

एनसीबीकडून गेल्या काही दिवसांत सातत्याने बॉलिवूडमधील मंडळींना टार्गेट करून कारवाया केल्याचा आरोपही केला जात आहे. एनसीबीने मोठा गाजावाजा करून क्रुझवरील ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीने याप्रकरणी अटकही केली. मात्र त्यानंतर या प्रकरणात अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गुन्हेगार आणि मनिष भानुशाली हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर सईल याने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ जारी करून खळबळ उडवली आहे.
हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपये मागितले गेले होते. पण, १८ कोटी रूपयात सौदा पक्का झाला होता, असा गौप्यस्फोट त्याने केला आहे. तसेच एनसीबी अधिकाऱ्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्याने म्हटले आहे. त्याने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याची तत्काळ दखल घेऊन उच्चस्तरीय समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

