राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्त्व टिकवणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर आता नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याच्या भूमिकेशी शरद पवार गट जुळवून घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे आज विधानसभेत स्पष्ट झाले.
विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नेमणूक झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नेमणूक उशिरा झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. काँग्रेसने त्यांचे नाव अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाहीर केले असे त्यांनी सांगितले. हा धागा पकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचे सूचित केले.
विजय वडेट्टीवार यांना पद मिळायला उशिर झाला असे काही जणांनी सांगितले. काँग्रेसला विरोधी पक्षनेत्याचे नाव देण्यास वेळ लागला असा आरोप करण्यात येत आहे. पण अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलल्यामुळे तो वेळ लागला. खरे म्हणजे २०१९पासून राज्यात राजकीय विक्रम झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री असे सरकार झाले. ते सरकार काही तासातच बदलले व नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असे सरकार आले. विधिमंडळाच्या इतिहासात नोंद करू नये असा हा काळ आहे. परंतु अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार आहेत

कुठे, त्यांच्याबरोबर नक्की किती आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसची नक्की संख्या किती हे सभागृहात सांगावे लागणार आहे. जनतेच्या मनात संशय आहे, तो दूर केला पाहिजे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी त्यावर निर्णय दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, सभागृहात नेमके काय चालले आहे हे आजही स्पष्ट झालेले नाही. अजितदादांबरोबर नेमके किती जण आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी ताकद काय आहे? त्यांचे सदस्य किती आहेत? एका विचाराने निवडून आलेले हे सदस्य कुठे आहेत? शिवसेनेचे प्रकरण न्यायालयात आहे. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत निर्णय आपल्यालाच घ्यावा लागणार आहे आणि तो आजच घ्यावा लागणार आहे. कारण हा जनतेमध्ये असलेला संभ्रम आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेल्या संभ्रम आहे. वडेट्टीवार यांना नेता म्हणून निवडायला आम्हाला उशिर झाला नाही तर राष्ट्रवादीमध्ये नेमके किती सदस्य आहेत हे फायनल व्हायला उशिर झाला आहे. अध्यक्षांनी आजही नेमके काय ते स्पष्ट केलेले नाही, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
पटोले यांच्या या भूमिकेनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपदी बसल्याबद्दल अभिनंदन करणारे भाष्य केले. या भाषणाच्या वेळेलाच त्यांनी पटोले यांना अपेक्षित नसलेले उत्तर आता आपण देत असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याकडे एक पत्र देऊन जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक करावी अशी विनंती केली होती. मात्र दोन ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी आणखी एक पत्र दिले आणि जितेंद्र आव्हाड यांचे नाव आम्ही मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. विजय वडेट्टीवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करावी. आमचा त्यांना पाठिंबा राहील असे त्यांनी कळवले. मात्र, या तीन आठवड्यात काँग्रेसकडून किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून कोणतेही पत्र आपल्याला मिळालेले नाही. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या नेमणुकीच्या दिरंगाईचे खापर अध्यक्षांच्या माथी मारण्यात काही अर्थ नाही आणि अध्यक्ष हेतूपुरस्सर अशी भूमिका घेतात असे दाखवण्यातही काही तथ्य नाही, याची नोंद घ्यावी, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची सत्ताधारी बाजूला झुकलेली भूमिका सर्वांसमोर आली.

