Homeपब्लिक फिगरसंजय राऊत, शरद...

संजय राऊत, शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?

शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्त्व करावे, असा न मागता सल्ला देणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी केला.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे, (गोकुळ) माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन नाना पटोले यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी झाले. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, आ. संग्राम जगताप, आ. अमित झनक, रामकिशन ओझा, देवानंद पवार, बाळासाहेब सरनाईक आदी यावेळी उपस्थित होते.

शिवसेना युपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्त्वाबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. सोनिया गांधी युपीएचे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहेत. युपीएची चिंता संजय राऊत यांनी करू नये, अशा शब्दांत पटोले यांनी राऊत यांचा समाचार घेतला.

महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत, असे ते म्हणाले.

संजय राऊत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत. सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटे बोलले असून ते सातत्याने खोटे बोलत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी करावी, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का? याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. त्यांनी जनतेची कामे केली पाहिजेत. सरकारे येतात, जातात. पण, महाराष्ट्राला बदनाम करू नका, असेही ते म्हणाले.

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्त्या प्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लिन चिट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते. त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का? नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप आहेत, त्यांनी राजीनामा दिला का? मग अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार?, असा सवालही पटोले यांनी केला. परमबीरसिंह, रश्मी शुक्लाप्रकरणी सरकारच्या घटकपक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही. काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याची वेळ मागितलेली असून त्यांची वेळ मिळताच महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content