Tuesday, March 11, 2025
Homeपब्लिक फिगरसंजय राऊत, शरद...

संजय राऊत, शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?

शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्त्व करावे, असा न मागता सल्ला देणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी केला.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे, (गोकुळ) माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन नाना पटोले यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी झाले. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, आ. संग्राम जगताप, आ. अमित झनक, रामकिशन ओझा, देवानंद पवार, बाळासाहेब सरनाईक आदी यावेळी उपस्थित होते.

शिवसेना युपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्त्वाबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. सोनिया गांधी युपीएचे नेतृत्त्व करण्यास सक्षम आहेत. युपीएची चिंता संजय राऊत यांनी करू नये, अशा शब्दांत पटोले यांनी राऊत यांचा समाचार घेतला.

महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत, असे ते म्हणाले.

संजय राऊत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत. सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटे बोलले असून ते सातत्याने खोटे बोलत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी करावी, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का? याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. त्यांनी जनतेची कामे केली पाहिजेत. सरकारे येतात, जातात. पण, महाराष्ट्राला बदनाम करू नका, असेही ते म्हणाले.

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्त्या प्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लिन चिट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते. त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का? नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप आहेत, त्यांनी राजीनामा दिला का? मग अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार?, असा सवालही पटोले यांनी केला. परमबीरसिंह, रश्मी शुक्लाप्रकरणी सरकारच्या घटकपक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही. काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याची वेळ मागितलेली असून त्यांची वेळ मिळताच महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content