Homeन्यूज अँड व्ह्यूजबाबा सिद्दीकी यांना...

बाबा सिद्दीकी यांना उंचावरून टिपले?

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू ‘आहेरा’सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे असे खेरवाडी परिसरात फिरले असताना वाटले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा आपले पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या पक्ष कार्यालयातून बाहेर रस्त्यावर चालत येऊन गाडीत बसायला जात असताना हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. एक पोटावर, एक छातीवर व एक डोक्यात. आता राजकीय पक्षाचा नेता म्हटला की, आजूबाजूला दोन-चार कार्यकर्ते तरी असणारच. म्हणजे ते सेमीगराड्यात असणारच. समजा कितीही नेमबाज शूटरने नेम धरला तरी एखादी गोळी आजूबाजूच्या लोकांना लागली असती, निदान चाटून तरी गेली असती. आम्ही हे अनुमान कार्यालयात बसून काढलेले नाही तर जेमतेम 20 /22 पावलांच्या रस्त्यावर तसेच परिसरात किमान दीड तास फेरफटका मारल्यावर सामान्य माणसाला जे समजते त्यावरून काढलेले आहे.

सिद्दीकी

हा पोलिसांच्या माहितीला छेद देण्याचा प्रयत्न मुळीच नाही. तो परिसर व तो रस्ता नेहमीच गर्दीचा असतो आणि त्यादिवशी देवींची यात्रा काढणार असल्याने गर्दीत मोठी वाढ होती. याचा अर्थ अधिक स्पष्ट आहे की, गर्दीचा माहोल असताना केवळ बाबा यांनाच सर्व गोळ्या कशा लागतात? म्हणजेच गोळ्या शेजारून वा आजूबाजूने झाडलेल्या नसाव्यात. दूरवरून वा काहीशा उंचावरून या गोळ्या झाडल्या गेल्या असाव्यात असे वाटते. उंचावरून झाडण्यासाठी हल्लेखोरांना अर्धवट पुनर्वसन झालेल्या दोन इमारती पक्ष कार्यालयासमोरच उभ्या राहिलेल्या आहेत. या इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या वा अन्य माजल्यांवर उभे राहून अचूक नेम साधला गेला असावा असा अंदाज आहे.

शिवाय काहीशा दूरवरून केलेला हा हल्ला नेमका त्यांच्या शरीरावरच कसा होतो याचाही विचार करणे गरजेचे आहे. बाबांना एकटे बाजूला करून हल्लेखोरांना ते एकटेच सापडतील असा कट तर कुणी केला नव्हता ना? फॉरेन्सिक अहवाल यावर प्रकाश पाडेलच. पण सामान्य माणूस म्हणून आम्हाला हा प्रश्न सतावत आहे. झिशान यांच्या पक्ष कार्यालयासमोर मधुकरराव सरपोतदार यांच्या कामगार संघटनेचे व श्रीकांत सरमळकर प्रतिष्ठानचे कार्यालय आहे. खेरवाडीतील हा रस्ता त्या मानाने छोटाच आहे. हा रस्ता छोटा असल्यानेच व केवळ बाबा यांनाच सर्व गोळ्या लागण्याने हे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस हल्लेखोरांना सहाय्य करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे सांगत असले तरी त्यांना सहआरोपी समजले जाईल यात शंका नाही. मग या संशयितानीच बाबांना हल्लेखोरांसमोर अलगद उभे केले असे मानावे का?

इक्बाल मिरचीशी संबंध?

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहजिन सिद्दीकी या पूर्वाश्रमीच्या अलका बिंद्रा असून त्या कथित आरोपी रणजित बिंद्रा यांच्या भगिनी आहेत. रणजित बिंद्रा यांना इक्बाल मिरचीबरोबर अवैध धंद्यात भागीदारी असल्याच्या आरोपवरून अटक करण्यात आली होती. रणजित बिंद्रा यांच्या सनब्लिंक रियल इस्टेट या कंपनीत मिरचीचे कोट्यवधी रुपये गुंतवण्यात आल्याचा इडीचा आरोप आहे. शिवाय बाबा यांनी निर्मल नगर परिसर व बांद्रा पश्चिम येथे काही जमिनी बळकावल्याचाही आरोप स्थानिक जनतेच्या चर्चेत होत आहे.

Continue reading

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...
Skip to content