Homeटॉप स्टोरीपार्लेश्वर फायनान्सचे गुंतवणूकदार...

पार्लेश्वर फायनान्सचे गुंतवणूकदार २० वर्षांपासून आशेवर…

मुंबईतल्या “पार्लेश्वर फायनान्स”च्या बचत योजनांत साडेसात कोटी रुपयांहून अधिक पैसे गुंतविलेले जवळजवळ ३०० गुंतवणूकदार गेल्या दोन दशकांहून (२० वर्षांहून) अधिक काळ आपले पैसे परत मिळतील या आशेवर जगत असून या बुडालेल्या कंपनीकडून पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

१ ऑक्टोबर १९८७ रोजी स्थापन झालेल्या (नोंदणी क्रमांक ४४८५८) “पार्लेश्वर फायनान्स एण्ड इन्हेस्टमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड”ची मान्यता रिझर्व बॅंकेने २८ जून २००४ला रद्द केली आणि कंपनीने गाशा गुंडाळला. “पार्लेश्वर फायनान्स एण्ड इन्हेस्टमेंट सर्विसेस प्राईवेट लिमिटेड”च्या अंतर्गत “पार्लेश्वर फायनान्स”, “अर्थवर्धन” आणि “युनिटी इन्हेस्टमेंट सोयायटी” अशा संलग्न कंपन्यादेखील स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्यांची कार्यालये विलेपार्ले पूर्व येथून चालत होती. सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींवर १४% व्याज देण्यात येऊन मॅच्युरीटीनंतर  वेळच्यावेळी त्यांचे पैसे परत केल्यामुळे, गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली.

गुंतवणूकदारांच्या ठेवींना विमा योजनेच सुरक्षाकवच असल्यामुळे ठेवी सुरक्षित असल्याची हमीही देण्यात आली होती. मात्र नंतर कंपनीने गुंतवणूकदारांच्या पैशातून काही लघु उद्योगांना कर्ज दिले. परंतु बऱ्याच उद्योजकांनी पैसे बुडविले आणि पार्लेश्वर फायनान्स डबघाईला आली. शेवटी कंपनीने ठेवी परत देण्यास टाळाटाळ केल्यामुळे गुंतवणूकदारांनी “महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपोझिटर्स इन फिनॅन्शियल इस्टाब्लिशमेंट १९९९” कायद्या अंतर्गत, विलेपार्ले पोलीसठाण्यात (सीआर 1/190/2004) आणि आर्थिक गुन्हे शाखा (सीआर 1/36/2004)अशी गुन्ह्यांची नोंद केली. याशिवाय एमपीआयडी कोर्ट (प्रकरण क्रमांक 28/04), मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात तक्रार केली.

मधल्या काळात कंपनीचे कांही संचालक आणि भागीदारांना शिक्षा होऊन त्यांना तुरुंगवासदेखील भोगावा लागला. कंपनीची काही मालमत्ता जप्त करण्यात आली तर काही मालमत्ता कंपनीचे संचालक व भागीदारांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विकून टाकली. आज कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण पुढे सरकत नाही आणि कंपनीला टाळे ठोकण्यात आले आहे. बरेच गुंतवणूकदार वृद्ध झाले आहेत तर काही हयात नाहीत. जे हयात आहेत ते आज ना उद्द्या आपले पैसे परत मिळतील, या आशेवर जगत आहेत.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content