विधानसभा सदस्यांकडून राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असतानाच लहानलहान पक्ष तसेच अपक्षांमधली खदखद उफाळून आल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पाचावर धारण बसली असल्याचे वृत्त आहे.
आघाडी सराकरमधील प्रहार संघटनेचे नेते व राज्यमंत्री बच्चू कडू तसेच बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारला इशारे दिले आहेत. कडू यांनी यांनी महाविकास आघाडी सरकारला धान आणि हरभरा खरेदीच्या प्रश्नावर कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या विषयावर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाबाबत शेवटच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारमध्ये अपक्ष आमदारांची कामे होत नाहीत. त्यामुळे त्यांना गृहित धरता येणार नाही, असेही ते म्हणाले.
आम्हाला कोणीही अस्पृष्य नाही. मला भाजपाच्या मोठ्या नेत्यांचे दिल्लीपासून फोन येत आहेत. आम्ही मतदानाच्या दिवसापर्यंत आमचा निर्णय करू शकतो. ठाकूर यांच्याकडे तीन तर कडूंकडे दोन आमदार आहेत. कडू यांनी महाविकास आघाडीला दिल्याने ते शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. आणखी एक अपक्ष आमदार, आशिष जायस्वाल यांनीही सरकार विरोधी सूर लावला आहे. सरकारमधील मंत्री माझ्यासारख्या आमदाराकडूनही कामे करण्यासाठी टक्केवारी मागत आहेत. अशा स्थितीत आम्ही सरकारच्या बाजूने मतदान का करावे, असा प्रश्न पडतो, असे त्यांनी सांगितले. सपाचे अबू आझमी यांनीही तटस्थ राहण्याची भाषा चालवली आहे.
या अशा वातावरणातच आज सायंकाळी वर्षा निवासस्थानी शिवसेना तसेच अपक्ष आमदारांची बैठक झाली. त्यानंतर या सर्वांना दक्षिण मुंबईतील विधानभवनाशेजारी असणाऱ्या ट्रायडंट, या पंचतारांकित हॅाटेलमध्ये हलवण्यात आले. या आमदारांच्या छोट्या-छोट्या गटांची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर टाकण्यात आली आहे. बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची एकत्र बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलावली आहे.
हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिकही नजर ठेवणार आहेत. सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या विविध टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांची फौज हॅाटेलच्या चारही बाजूला असेल. येणा-जाणाऱ्या आमदारांवर शिवसेनेचे कार्यकर्ते नजर ठेवतील. सकाळी सर्व आमदारांची स्वाक्षरी एका कागदावर घेतली जाईल. मराठवाड्याच्या बैठकीला मोजकेच नेते आणि फक्त मराठवाड्यातले सहा आमदार उपस्थित राहतील. सभा संपल्यानंतर मराठवाड्यातले सहा आमदारांना विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येईल, असे समजते.
विधानसभेतील पक्षीय बलाबल
शिवसेना- 55, राष्ट्रवादी- 53, काँग्रेस- 44, बहुजन विकास आघाडी- 3, समाजवादी पार्टी- 2, प्रहार जनशक्ती पार्टी- 2, माकप- 1, शेकाप- 1, स्वाभिमानी- 1, क्रांतिकारी शेतकरी पार्टी- 1, अपक्ष- 9 (सत्ताधाऱ्याबरोबरचे). भाजपा- 106, जनसुराज्य शक्ती- 1, राष्ट्रीय समाज पक्ष- 1
अपक्ष- 4 (विरोधकांच्या बाजूने).

