डीपटेक अर्थात गहन तंत्रज्ञानाला गती देणाऱ्या ‘समृद्धी परिषद’ या अभियानाचे उद्घाटन पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी आणि जल तंत्रज्ञानातील अभिनव तंत्रज्ञानाला गती देणारा समृद्धी हा कार्यक्रम बाजारपेठ, संशोधन, नवोन्मेष आणि विकास यांन धोरणात्मक पद्धतीने गती देणारा म्हणजे आयसीपीएस स्टार्ट अप उद्योगांसाठी सुरु करण्यात आलेला व्यापक उपक्रम आहे. आंतरशाखीय सायबर-भौतिक प्रणालींवर (एनएम-आयसीपीएस) आधारित राष्ट्रीय अभियानाअंतर्गत उभारण्यात आलेल्या आयआयटी रोपारमधील iHub AwaDH या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्राने हा कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (डीएसटी) विभागाचे ज्येष्ठ सल्लागार तसेच विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाचे सचिव डॉ.अखिलेश गुप्ता यांनी भारताला तंत्रज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्यासाठी एनएमआयसीपीएस करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. आयसीपीएसशी संबंधित एनएमच्या अभियान संचालक डॉ.एकता कपूर यांनी कृषीविषयक पायाभूत सुविधा, आरोग्य, संरक्षण आणि पर्यावरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सीपीएस तंत्रज्ञानविषयक हस्तक्षेपांना चालना देणाऱ्या या अभियानाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला.

देशभरात एनएमआयपीएसच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यात डीएसटी बजावत असलेली महत्त्वाची भूमिका या कार्यक्रमात अधोरेखित झाली. या अभियानाने 311 विविध तंत्रज्ञाने, 549 तंत्रज्ञानविषयक प्रकल्प यांच्या निर्मितीला मदत केली तसेच 1613 सीपीएस संशोधन केंद्रांची उभारणी करून 60000 हून अधिक सीपीएस कौशल्य केंद्रांच्या निर्मितीत योगदान दिले.
आयआयटी रोपार मधील iHub AwaDH या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला 46 गुंतवणूक भागीदारांचे पाठबळ लाभले असून 50 पेक्षा जास्त परीक्षक सदस्यांनी स्टार्ट अप उद्योगांचे मूल्यांकन करून त्यांना मार्गदर्शन केले.