Homeटॉप स्टोरीअजितदादांचं घर आहे...

अजितदादांचं घर आहे पत्नीच्या नावे..

लोकसंख्येच्या पन्नास टक्के प्रमाण असलेल्या महिलांना खूष करणारा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गृहस्वामिनीला खऱ्या अर्थाने घराची मालकीण बनवणारी योजना आणलीय आणि या प्रतिनिधीच्या प्रशानाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमचं घर आधीच पत्नीच्या नावावर आहे.

नवीन घर घेताना घराची नोंदणी गृहस्वामिनीच्या नावानं केली, किंवा गृहस्वामिनी, कन्या किंवा सासू यांच्या नावानं केली तर मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना पवार यांनी जाहीर केलीय. नवीन घर एकट्या महिलेच्या नावावर, महिला तसंच मुलगी किंवा महिला आणि सासू यांच्या नावावर असावे तरच मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळू शकेल, हे आदेशात आपण नमूद करू आणि एक एप्रिलपासून राज्यात ही योजना लागू करू, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

अर्थसंकल्प सादर करताना आजचा दिवस ८ मार्चचा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, असं सांगून पवार म्हणाले की, शुभशकुनांचं तोरण तू.. देव्हाऱ्यातले चंदन तू.. नवनिर्मितीची गाथा जिथे.. आपण सर्वांनी टेकावा माथा..

अशा शब्दांत महिलांचं वर्णन करून त्यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना जाहीर केली. महिलांना घर नावावर मिळण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या या योजनेबरोबरच पवार यांनी ग्रामीण भागातल्या मुलींना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मोफत बसप्रवासाची सोयही केलीय आणि त्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना जाहीर करत यासाठी दीड हजार बसगाड्यांची सोयही सरकार करणार आहे. नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्योगिनी योजनेतून दहा हजार महिला बचत गटातल्या महिलांना लाभ होईल. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना असंघटित घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कल्याणाची संधी उपलब्ध करून देणार आहे. महिला दिनानिमित्ताने स्वतंत्र महिला गट राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना करण्याची घोषणा करतो, असंही पवार यांनी जाहीर केलं.

कोरोनाचा महाराष्ट्राला ७० हजार कोटीचा फटका

मुंबईसह राज्याला आणि देशासह संपूर्ण जगाला भेडसावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राला सत्तार हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या २०२१-२२च्या अर्थसंकल्पातून ही गोष्ट समोर आली आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्प मांडताना महसुली जमा साडेतीन लाख कोटी रुपयांची अपेक्षित होती. पण कोरोनामुळे ती केवळ दोन लाख ऐंशी हजार कोटी रुपयांचीच होऊ शकल्याचं पवार यांनी सांगितलं. त्यामुळे करोनामुळे महसुली जमेमध्ये सत्तर हजार कोटींचा फटका बसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राला जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकराच्या परताव्यापोटी केंद्र सरकारकडून तीस हजार कोटी रुपये येत्या ३१ मार्चपर्यंत येणं अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले. केंद्राकडून हे तीस हजार कोटी रुपये येत्या महिनाभरापर्यंत येतील, असं वाटत नाही, हे सांगून महसुली तूट एक लाख कोटीपर्यंत जाईल, असा अंदाजही पवार यांनी व्यक्त केला.

रडगाणं न गाता राज्य पुढे – मुख्यमंत्री

कोणत्याही प्रकारचं रडगाणं न गाता आर्थिक संकटाचा सामना करत समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला म्हणून मी अजित पवार यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content