महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा देण्याचा मनोदय आज पूर्ण झाला. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा प्रमाण मानत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदमुक्त केले आहे. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातून जारी केलेल्या एका आदेशाद्वारे आज 13 राज्यपाल तसेच नायब राज्यपाल यांच्या नेमणुका करण्यात आल्या. निवृत्त लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्राम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीमचे राज्यपाल असतील. सी. पी. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली असून हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला काम पाहणार आहेत. गुलाबचंद कटारिया आसामचे नवे राज्यपाल असतील.

निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याआधी ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया ओकिये यांची मणिपूरच्या राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मणिपूरचे राज्यपाल एल. ए. गणेशा यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

