Homeपब्लिक फिगररेमडेसिवीर, ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राला...

रेमडेसिवीर, ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राला मोकळीक द्या!

कोविड-19 रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्री मोदी यांना पत्र पाठवले असून त्यात हे नमूद केले आहे. राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती सर्वात बिकट आहे. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, लॉकडाऊन जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. त्यामुळे या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100 टक्के लसीकरणाची गरज आहे. यासाठी कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरुन योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावे, अशी विनंतीही ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांनी पाठवलेले पत्र

गेल्या वर्षी कोविड-19ची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रात निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. आज सारा देश कोविड-19च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट आहे.

कोविड-19ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभर पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?

या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100 टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आणि कळीची आहे. महाराष्ट्राला 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राची साथ तर हवीच. म्हणून माझी केंद्राकडे मागणी आहे की, राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या, राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात, ‘सीरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (हाफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, कोविड-19 रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, असे ठाकरे या पत्रात म्हणाले.

कोविड-19च्या साथीमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहे. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरुन योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, ज्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल. या सर्व सूचनांकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहाल आणि प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा नव्हे खात्रीच आहे, असेही ते आपल्या पत्रात म्हणाले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content