Homeटॉप स्टोरीमहावितरणच्या अभय योजनेला...

महावितरणच्या अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.

राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबरला संपल्यानंतर तिला ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना ३१ मार्च २०२५पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र ३१ मार्च २०२५नंतर या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.

अभय

राज्यातील ९३८४८ वीज ग्राहकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून १३० कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ५७ कोटी ३६ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी १२ लाख रुपयांचा विलंब आकार माफ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास  कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रँचायझी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू आहे. संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून या योजनेची माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.                                     

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content