‘एक झुंज वाऱ्याशी’, या अत्यंत गाजलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या नाटकाचा २५वा प्रयोग येत्या शुक्रवारी, २५ ऑगस्टला मुंबईतल्या प्रेक्षकांना अवघ्या २५ रुपयांत पाहता येणार आहे.
“सत्तेत असणाऱ्या माणसांनी प्रामाणिक असायला हवं”, “छोट्याशा गोष्टीसाठी न्याय मागतानाही भीमाचं बळ लावावं लागतं आपल्याला…” स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही आपल्याकडे आजही तशीच परिस्थिती आहे. आजही माणसं बदलली तरी संदर्भ तेच आहेत. अशावेळी एक सामान्य माणूस आपला काहीही संबंध नसताना, तिसऱ्या कुणावर झालेल्या अन्यायासाठी पेटून उठतो…
सामान्य माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देऊ पाहणारं पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेलं एक दमदार नाटक अवघ्या २५ रुपयांत नाट्यरसिकांना पाहायला मिळणार आहे. व्हिजन निर्मित, एक झुंज वाऱ्याशी, नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग शुक्रवार, २५ ऑगस्ट, रात्रौ ८.१५ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे रंगणार आहे. सुप्रिया प्रॉडक्शन्स, यांच्या सहयोगाने या नाटकाचे हे प्रयोग होत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे. आजपर्यंत अनेक नाट्यसमीक्षकांनी गौरवलेले हे नाटक अलीकडच्या काळातील नाट्यरसिकांनी आवर्जून पाहावे, असे आवाहन सुप्रिया प्रॉडक्शनच्या सुप्रिया चव्हाण यांनी केले आहे.

