Homeटॉप स्टोरीआजही पवारांची मित्रपक्षांवर...

आजही पवारांची मित्रपक्षांवर कुरघोडी! पुन्हा पावसात भिजण्याचा प्रयोग!!

बदलापूर मध्ये घडलेल्या चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्यापासून आपल्या मित्रपक्षांवर केलेली कुरघोडी आज शरद पवार यांनी कायम राखली. त्याचप्रमाणे भरपावसात भिजत आंदोलन करून शरद पवार यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत लोकांकडून मिळालेली सहानुभूती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्नही केला.

आज सकाळी अकरा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत, असा एक तास तोंडाला काळी पट्टी लावून तसेच काळे झेंडे घेऊन निषेध करण्याचे आंदोलन काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. हे जाहीर करताना त्यांनी आपण, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी, तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आज सकाळी दहा वाजण्याच्या आधीच शरद पवार यांनी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध आंदोलनाला सुरुवात केली. वयोमानानुसार ते खाली बसू शकले नसले तरी खुर्चीवर मात्र ते स्थानापन्न झाले.

त्यांनी तोंडाला काळा मास्क लावला होता. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या खासदार सुप्रिया सुळे याही त्यावेळी हजर होत्या. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकरही शरद पवार यांच्या बाजूला दिसत होते. मात्र मोहन जोशींनी तोंडाला काळी पट्टी लावल्याचे किंवा तसा मास्क लावल्याचे दिसून आले नाही. किंबहुना तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क लावण्याऐवजी कपाळावर, डोक्यावर काळी रिबीन लावली होती. काही जणांनी दंडाला काळा पट्ट्या लावल्या होत्या. त्यातच पुण्यात पावसाला सुरुवात झाली आणि भर पावसातच पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवले. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या साडीचा काळा पदर डोक्यावरून घेत पावसातच खुर्चीत बसकण मारली होती. कदाचित मागच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये भरपावसात केलेल्या भाषणाने राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा विजय सोपा केला होता, तसा इम्पॅक्ट यावेळीही होईल का, असा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला असावा, अशी चर्चा तेथे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होत होती.

शपथपत्राचे वाचन करत शरद पवारांनी ११ वाजून पाच मिनिटांनी आंदोलन संपवले आणि त्यांचा ताफा रवानाही झाला. मात्र, तोपर्यंत ना उद्धव ठाकरे आपल्या आंदोलनस्थळी पोहोचले, ना नाना पटोले. साडेअकरा वाजोपर्यंततरी त्यांच्या नियोजित आंदोलनस्थळी त्यांचे समर्थकच आपल्या नेत्यासाठी ताटकळत होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content