केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत येत्या वर्षाचा म्हणजेच २०२२-२३ सालचा अर्थसंकल्प सादर केला. आज संध्याकाळी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांतून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता दोन्ही कार्यक्रम ऑनलाईन होतील. जनतेने यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रमा प्रकाशनाने केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषणाचा (फलश्रुति) कार्यक्रम आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आणि पूर्वेश शेलटकर हे या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करतील. इंडियन आँईल काँरपोरेशन, बीएस ई आय ई एफ आणि एनकेजीएसबी बँक यांचे या कार्यक्रमास सहप्रायोजकत्व लाभले आहे.
मिती क्रियेशन्स फेसबुक लाईव्हवर सायंकाळी ६ वा. सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि रमा प्रकाशनचे संचालक प्रकाश कुलकर्णी यांनी केले आहे. मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/mitigroup) आणि मिती ग्रुप डिजिटल या युट्यूब चॅनलवर हे विश्लेषण पाहता येईल.
सावरकर स्मारकातर्फेही होणार अर्थसंकल्पाचे विश्लेषण
मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे केले जाणारे अर्थसंकल्प लाइव्ह विश्लेषण आज, बुधवारी २ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार आहे. अर्थसंकल्पाचे विश्लेषण डॉ. नरेंद्र जाधव थेट करणार आहेत. त्यासाठी https://www.youtube.com/user/SavarkarSmarak या लिंकवर जाऊन डॉ. जाधव यांनी केलेले अर्थसंकल्पावरील भाष्य पाहता येईल. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
व्यापार, सूक्ष्म, लघु उद्योगांच्या पदरी निराशा – महाराष्ट्र चेंबर
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी तितकासा आशादायक नाही असं म्हणावं लागेल. परंतु त्याचबरोबर केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे व शेती क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा अप्रत्यक्षपणे व्यापार, उद्योगाला होणार आहे. सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पाचे वर्णन करायचं झालं तर शेती व पायाभूत सुविधांच्यावर भर देणारा संमिश्र अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली आहे.

व्यापार आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रं गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडामध्ये फार मोठ्या नुकसानीला सामोरे गेले आहे. या दोन्ही क्षेत्रासाठी सरकार कोणती ना कोणती थेट मदतीची योजना लागू करेल अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा मात्र या अर्थसंकल्पात पूर्ण झाली नाही. मात्र शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, नऊ लाख हेक्टर नवीन जमीन शेतीखाली आणणे याबरोबरच शेतीला एमएसपीसाठी दोन लाख कोटींची तरतूद या काही चांगल्या गोष्टी शेतीच्या विकासासाठी केल्या आहेत. अजूनही बरेच काही करता येणे शक्य आहे. ते सरकार करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्टार्टअप इंडस्ट्रीला इन्कमटॅक्सचा इन्सेन्टिव्ह १ वर्षाने वाढवून दिला. अर्थात कोरोनामुळे ते वाढवून देणे क्रमप्राप्तच होते. याबरोबर कृषी क्षेत्रातल्या स्टार्टअपसाठी नाबार्डकडून थेट कर्जपुरवठा करण्याचा निर्णय अतिशय चांगली गोष्ट आहे. नाबार्डकडून हा कर्जपुरवठा होताना सहज, सुटसुटीत व कमी व्याजदरात होणे अपेक्षित आहे. नाबार्डच्या नेहमीच्या बँकिंग पद्धतीने तो करून चालणार नाही तर व्हेंचर कॅपिटल व एन्जल गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हा कर्जपुरवठा स्टार्टअपला मिळाला तर त्याला खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे. कृषी क्षेत्राच्या स्टार्टअपसाठी नाबार्डने दिलेले अर्थसहाय्य कृषी क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार असून तरुणांना नवीन संकल्पना साकार करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे, असेही गांधी म्हणाले.

