Sunday, February 23, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईट१७५३ शेतकऱ्यांना दिवसा...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात झाला. या प्रकल्पामुळे १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प आहे. धोंदलगाव प्रकल्प ही सुरुवात आहे. यावर्षी मार्चमध्ये प्रदान केलेल्या ९२०० मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांचा हा एक भाग आहे. प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

धोंदलगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या १३ एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कामासाठी महावितरणकडून संबंधित कंपनीला ७ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला. १७ मे रोजी वीजखरेदी करार करण्‍यात आला.

वीजपुरवठा

त्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यांत प्रकल्प उभारून ५ सप्टेंबरला तो कार्यान्वित करण्यात आला. हा प्रकल्प महाविरणच्या धोंदलगाव ३३ केव्ही उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या ५ वीजवाहिन्यांवरील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार आहे. धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

फडणवीस यांनी ३० जून २०२२ रोजी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर किमान तीस टक्के कृषी फीडर्स डिसेंबर २०२५पर्यंत सौरऊर्जेवर चालविण्यासाठी मिशन २०२५ जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. मिशन मोडवरील या योजनेतून सौरऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट ७ हजार मेगावॅटने वाढवून १६ हजार मेगावॉट विकेंद्रीत सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.

सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची व त्याच्या आधारे कृषी पंप चालवायचे अशी ही योजना आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरुपात सौरऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे.

Continue reading

अनेक फेस्टिवल गाजवणारा ‘फॉलोअर’ २१ मार्चला चित्रपटगृहात

आजवर अनेक फिल्म फेस्टिवल आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झालेला 'फॉलोअर' हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. मराठी, कन्नडा आणि हिंदी या तिन्ही...

आता ऑनलाईन क्विक कॉमर्स स्पर्धेत छोट्या दुकानदारांना मिळणार मदतीचा हात

सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर असलेली किराणाप्रो ही भारतातील पहिली ओएनडीसी-संचालित क्विक कॉमर्स कंपनी बनली आहे. दक्षिणेतल्या या कंपनीकडे भारतातील आघाडीचा एआय-संचालित क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट वैगेरे वाढत्या ऑनलाईन क्विक कॉमर्स स्पर्धेत आता देशभरातील छोट्या...

शाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची सर्वात छोटी SIP योजना लाँच

शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी "तरुण" योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया...
Skip to content