मुंबई कोस्टल रोड (किनारी रस्ता) प्रकल्पाने गेल्या महिन्यात २६ एप्रिलला मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग (सी लिंक) पहिल्या महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर)ने सांधल्याचा टप्पा पार केल्यानंतर काल, बुधवारी पहाटे सहा वाजून ७ मिनिटांनी दुसरी महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर)देखील यशस्वीपणे स्थापन केली.
मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी, ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, उपाध्यक्ष अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख संतोष राय आदी यावेळी उपस्थित होते.

आज पहाटे ३ वाजेपासून तुळई टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रवाहकीय हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही दुसरी तुळई आधी बसविलेल्या पहिल्या तुळईकडे सरकविण्यात आली. चारही बाजूचे कोन तंतोतंत जुळल्यानंतर पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी अडीच हजार मेट्रीक टन वजनाची तुळई यशस्वीपणे जोडण्यात आली. खुल्या समुद्रात लाटांचा अंदाज घेत मोठ्या तराफ्याच्या मदतीने ही तुळई जोडली गेली. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत.
वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाकडून मुंबई किनारी रस्त्या प्रकल्पाकडे जाणाऱ्या बाजूवर याआधी पहिली तुळई स्थापन करण्यात आली आहे. पहिली तुळई बसविताना आजूबाजूला मोकळी जागा असल्याने अभियंत्यांना अंदाज घेण्यासाठी पुरेसा वाव होता. परंतु आज, दुसरी तुळई स्थापन करताना तितकीशी मोकळीक नव्हती. पहिल्या तुळईचा अंदात घेत अतिशय सावधपणे ही मोहीम पार पारण्याचे मोठे आव्हान होते. पहिल्या तुळईपासून अवघ्या २.८ मीटर अंतरावर दुसरी तुळई स्थापन करणे काहीसे जोखमीचे होते. परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि कामगार यांनी अतिशय कुशलतेने ही मोहीम पार पाडली.

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
अडीच हजार मेट्रिक टन वजनाची तुळई
मुंबई किनारी रस्त्यावर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या तुळईपेक्षा तुलनेने दुसरी तुळई वजनाने, लांबी-रुंदीने मोठी आहे. दुसरी तुळई ३१.७ मीटर रुंद, ३१ मीटर उंच आणि १४३ मीटर लांब आहे तर वजन अडीच हजार मेट्रिक टन आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे लहान सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. न्हावा बंदरातील माझगाव गोदी केंद्रातून रविवारी, १२ मे रोजी सकाळी दुसरी तुळई घेऊन तराफा (बार्ज) निघाला होता.
