राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पडल्याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद झाला आहे, कारण आपले मंत्री गेली अडीच वर्षे फक्त पैसे खायचे काम करत होते, असा बॉम्ब नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी टाकला आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यातले सगळेच माजी मंत्री सुन्न झाले.
नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी राज्यातल्या सर्व काँग्रेस नेत्यांना घरचा अहेर दिला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बुधवारी दुपारी झाली. या बैठकीमध्ये म्हात्रे यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप केल्यानंतर उपस्थितांपैकी अनेकांनी बरोबर बोलतोय, बरोबर बोलतोय…, असे आवाज देत म्हात्रे यांचे समर्थनच केले.
या विस्तारित कार्यकारिणीसाठी अखिल भारतीय़ काँग्रेस समितीच्या वतीने केंद्रीय चिटणीस आशिष दुआ, सोनल पटेल यांच्यासह चार जण उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम यांसारखे नेतेही उपस्थित होते. आमदार, मंत्री यासह पदाधिकारी मिळून दीडशे जण या बैठकीला उपस्थित होते.
आपले सगळे मंत्री गेली अडीच वर्षे फक्त पैसे खायचे काम करत होते आणि त्यांच्याकडे भेटायला गेल्यावर दोन-दोन तास बाहेर बसवून ठेवायचे. कारण, त्यांच्या दालनांमधे दलालांची गर्दी असायची. त्यामुळे हे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्य़ांना झाला आहे, अशा आशयाचे विधान करून रमाकांत म्हात्रे यांनी दिलेला घरचा अहेर आणि त्याला बैठकीतल्या इतरांनी दिलेला पाठिंबा, यामुळे राज्यातील काँग्रेस श्रेष्ठींच्या डोळ्यासमोर भर दुपारी तारे चमकले होते.

