काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर जनतेत संभ्रम आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत आणि त्यांनी अजित पवार यांच्याबरोबरच्या भेटीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले.
एमसीए क्लब येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात ३ सप्टेंबरपासून पदयात्रा सुरू होत असून या पदयात्रेची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. ४८ लोकसभा मतदारसंघातील निरिक्षकांच्या अहवालावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रात व राज्यातील भाजपा सत्तेला उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच आमचा प्लॅन आहे. महाराष्ट्र हे काँग्रेस विचारांचे राज्य आहे. काँग्रेस व मित्र पक्ष एकत्र लोकसभा निवडणुका लढले तर ४०-४५ जागा जिंकू शकू, असे चित्र राज्यात आहे. त्यासाठी काँग्रेस तयारी करत आहे. आमचे टार्गेट भारतीय जनता पक्ष आहे. जे पक्ष सोबत येतील त्यांच्यासह लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे.

काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे, त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी, तरुणांच्या आत्महत्त्या वाढत आहेत, बेरोजगारी वाढली आहे. नोकऱ्या नाहीत, व्यवसाय चालत नाहीत. यातून पुण्यात २१८ तरुणांनी आमहत्त्या केल्या आहेत. राज्यातील इतर भागातही हीच परिस्थिती आहे. पण लोकं मेली तरी चालतील, पण सत्ता कायम राहली पाहिजे, ही सत्तेला चिकटून बसण्याची भाजपाची प्रवृत्ती आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करताना, महागाई परदेशातील परिस्थितीमुळे वाढली आम्ही, वाढवली नाही असे खोटं सांगितले. मोदी सरकार देशातील आर्थिक स्थिती हाताळू शकले नाही, म्हणूनच महागाई वाढली. रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. तरीही महागाईचे खापर मात्र परदेशावर फोडून मोदींनी हात वर केले. मोदी सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारही वाढले, सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. मोदी सरकारविरोधात जनतेत तीव्र संताप आहे. पण मोदी मात्र पुन्हा येणार… अशी घोषणा करतात. लोकशाहीत असा अहंकार चालत नाही, असेही ते म्हणाले.

