महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाने कहर केल्यानंतर बचावकार्यासाठी लष्कराच्या १५ तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली भागातल्या पूरग्रस्त भागात नागरी प्रशासनाच्या मदतीसाठी तसेच पूरग्रस्तांना अन्न्पदार्थ व पिण्याचे पाणी पोहोचवण्यावर या तुकड्यांचा भर राहील.

औंध तसेच पुण्याहून या तुकड्या निघाल्या आहेत. चिपळूणमध्ये लष्कराची एक तुकडी मदतकार्यातही गुंतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी संपर्क केला, तेव्हा केंद्र सरकारतर्फे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केल्या जात असलेल्या मदतीची माहिती त्यांनी दिली. त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सातत्याने राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त चमू महाराष्ट्रात पाठविले आहेत. एनडीआरएफची 26 पथके, भारतीय हवाईदलाचे एक सी-17, दोन सी-130 तसेच एक एमआय-17 हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

एनडीआरएफचे सर्वाधिक 4 चमू रत्नागिरीत, कोल्हापुरात 3, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी 2 तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी 1 चमू तैनात आहे. कोलकाता आणि बडोदा येथून प्रत्येकी 4 चमू येत आहेत. एनडीआरएफच्या वतीने तळिये या गावातसुद्धा मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले जात आहे, अशी माहिती नित्यानंद राय यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.

पिण्याचे पाणी पाठवण्याची केली विनंती
दरम्यान, आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि पिण्याचे पाणी तसेच अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या भागात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, निरंजन डावखरे हेसुद्धा सातत्याने पाहणी करत आहेत. त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थितीची माहिती फडणवीस घेत आहे.
या पाऊस आणि पुरात तसेच भूस्खलनाच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखत प्रशासनाने अधिक गांभीर्याने स्थितीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली आहे. तळिये गावात मृतदेह बाहेर काढण्याचे काम गावकर्यांना करावे लागले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. देवेंद्र फडणवीससुद्धा केंद्र सरकारशी संपर्कात आहेत. रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या आप्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी 2 लाख रूपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.

